Wednesday, October 13, 2010

'दबंग'च्या खाणीतला 'मस्त मस्त' हिरा

काही गाणी मनात रुजतात. खोलवर. कुठंतरी आत भिडतात. त्यातले प्रत्येक शब्द, प्रत्येक आलाप प्रत्येकवेळी नवा अर्थ देऊन जातो. अत्यंत टिपिकल हिंदी चित्रपट 'दबंग'मध्ये असं गाणं मिळालं आणि जाम आनंदलो. अशी गाणी म्हणजे खूप देखण्या कविता असतात. कोरीव. त्यामुळंच कित्येकदा एेकल्या तरी पुनःपुन्हा एेकावाश्या वाटतातच...'दबंग'च्या कोळशाच्या खाणीतलं हे रत्न आहे, 'तेरे मस्त मस्त दो नैन'..

गीत लिहिलंय फैज अन्वर यांनी
संगीत आहे साजीद वाजीद यांचं
आणि गायक आहे राहत फतेह अली

ही देखणी कविता अख्खी लिहून काढावीशी वाटली !

ताकतें रहते तुझकों सांझ सबेरे
नैनो में हायें...
नैनो में...
हायें...
ताकतें रहते तुझकों सांझ सबेरे
नयनों में बसिया नैन ये तेरें
नयनोंमें बसिया नैन ये तेरें
तेरे मस्त मस्त दो नैन
मेरे दिलका ले गये चैन
मरे दिलका ले गये चैन
तेरे मस्त मस्त दो नैन

पहले पहल तुझें
देखा तो दिल मेरा
धडका हाये धडका
धडका हायें

पहले पहल तुझें
देखा तो दिल मेरा
धडका हाये धडका
धडका हायें
जलजल उठां हूँ मै
शोला जो प्यार का
भडका हायें भडका
भडका हायें
नींदोंमें घुल गये है
सपनें जो तेरे
बदले से लग रहे है
अंदाज मेरें
बदले से लग रहे है
अंदाज मेरें

तेरे मस्त मस्त दो नैन
मेरे दिलका ले गये चैन
मरे दिलका ले गये चैन
तेरे मस्त मस्त दो नैन

माहिं बेआबसा
दिल ये बेताबसा
तडपा जायें
तडपा जायें
नैनों की झिल में
उतरा ता युहीं दिल
डुबा जाये डुबा
डुबा जाये

होशों हवास अब तो
खोने लगे है
हम भी दिवाने तेरे
होने लगे है
हम भी दिवाने तेरे
होने लगे है
तेरे मस्त मस्त दो नैन
मेरे दिलका ले गये चैन
मरे दिलका ले गये चैन
तेरे मस्त मस्त दो नैन

ताकतें रहते तुझकों सांझ सबेरे
नयनों में बसिया नैन ये तेरें
नयनोंमें बसिया नैन ये तेरें
तेरे मस्त मस्त दो नैन
मेरे दिलका ले गये चैन
मरे दिलका ले गये चैन
तेरे मस्त मस्त दो नैन

Thursday, October 7, 2010

जिंदगी की किताब...

इक किताब होती जिंदगी...
हर इक पन्ना मै बंद कर देता
जब चाहूँ...
खोल देता वही पन्ना 
जिसें चाहूँ...

एहसास बन गया है अब
पन्नोंका...

जाना था जिनकों चलें गयें..
हाथ में थमाकर 
किताब जिंदगीकी की हम
ना खोल सकें ना बंद...

Wednesday, September 15, 2010

बाबा...

बाबा,

तुमच्याबद्दल लिहायचंय. तुमच्याबद्दल मला काय वाटतंय, हे सारं काही लिहायचंय. मोकळं व्हायचंय एकदा लिहून. खूप साचलंय सगळं. मनात रडायची सवय घातक. कधी जडलीय मला, तुम्हालाच माहिती. मोठ्यांदा रडायची सवय नाही आणि मनातल्या हुंदक्यांनी आत अंगभर कसर राहतेय. 

डोक्यात आठवणींचा कल्लोळ आहे. खूपशा. एकमेकांत गुंतत गेल्यात. काय लिहायचं, सुरूवात कशी करायची हेच सुचत नाहीय इतके दिवस. 

तुम्ही होता, तेव्हा कदाचित तुमचं अस्तित्व माझाच भाग होतं. ते लक्षातही नव्हतं आलं कधी...आता प्रत्येक दिवशी, जवळपास प्रत्येक क्षणी तुम्ही मला आठवताय. एक-दोन दिवस नाही, वर्षभर होतंय असं. आता जाणवतंय बाबा, तुम्ही माझ्यासाठी काय होतात...

खूप लहानपणी, म्हणजे माझ्या लहानपणी आपण दोघं मित्र होतो. शाळेतून यायच्या वेळी तुम्हीच तर घरी असायचात. भरवलेला प्रत्येक घास मला आत्ताच का रोज आठवतोय बाबा? तुमची नोकरी गेली होती आणि धंद्यात फसवणूक झाली होती, हे कधीच कसं तेव्हा लक्षात नव्हतं आलं? मी शाळेतून येताना दारात पायऱयांवर बसलेले तुम्ही दिसला नाहीत, तर होणारी चिडचीड लख्खं आठवतीय. आताही रोज घरी जाताना फ्लॅटचं दार उघडताना हीच चिडचीड होतेय बाबा...

खूप लिहायंचय बाबा. तुमच्याबरोबर जगलेला प्रत्येक क्षण लिहून काढायचाय. त्याशिवाय मोकळा होणार नाही बाबा मी...आणि कदाचित तुम्हीही...

Tuesday, August 3, 2010

महाबळेश्वरच्या पावसासारखं सुख नाही...!

  (फोटो काय आपला नाही. कुठून घेतला; आठवत नाही. ज्यानं काढला, त्याला सलाम...! आमच्या मनातलं त्यानं फोटोतनं दाखवलं म्हणून...)
पावसासारखं सुख नाही. धबाधबा कोसळणाऱया पावसात धुंद होऊन बाईक चालविण्यासारखं सुख खरंच नाही. अनुभवलं असेल, तर प्रश्नच नाही. नसेल कधी अनुभवलं, तर यंदाच्या पावसाळ्यात एकदा तरी अनुभवा. व्यक्तिशः मला हा प्रकार भयाण आवडतो. कधी एकदा पाऊस कोसळतो, असं होऊन जातं. मित्र बोंबलत असतात, की येड्या, पाऊस तेवढा नको रे आणि मी म्हणत असतो, अरे, येऊदे रे...येऊदे रे...

बाईक राईडसाठीचा पाऊस कसा झडझडून हवा. तासन् तास कोसळणारा. उगाच एखादी भुरटी सर सोडून जाणारा नव्हे. महाबळेश्वरसारखा किंवा कोयनेतल्या नवजासारखा. चिंब चिंब करणारा. नखशिखांत शिरशिरी आणणारा. महाबळेश्वरमध्ये एकदा अशा पावसात बाईक राईड केली होती. तिथंला पाऊस मुळातच अफाट. अंगावर येऊन येऊन धडका देणारा. तडातडा वाजणारा. एक एक थेंब गड्डी लसणाएवढा. पावसाचा स्वतःचा रौद्र नाद असतो, तो इथं अनुभवायला नक्की मिळतो.

महाबळेश्वरमध्ये अशा भर पावसात बाईक राईड करताना एकप्रकारची तंद्री लागते. आपोआप. आसपासचं काही भान राहात नाही. वीस-पंचवीस फुटी रस्ता. निर्मनुष्य. मागून गाडी नाही की पुढून नाही. सारं महाबळेश्वर गपगार झालेलं. फक्त एक बाईक. पावसात रस्ता कापत चाललेली. अशा पावसाशी मस्ती करायची नसते. दोस्ती करायची असते. म्हणजे, मस्तवालपणे बाईक मारायची नसते. पावसाला दाद देत, त्याच्याशी बोलत, त्याला मोठ्ठं मानून, मान देत हळू हळू चालायचं असतं. मस्तवालपणा केला, की कुठला तरी खड्डा तुमच्यासाठी आ वासून बसवतोच हा पाऊस...!

जुन्या महाबळेश्वरकडून येताना अशी झड लागली होती. दोन्ही बाजूंनी झाडी. ओलीचिंब. पानं पानं जणू पाझरायला लागलेली. पाण्याचे लोटच्या लोट रस्त्यातून वाहू लागलेले. वरून सर्र सर्र सपाटा सुरूच. रेनसूट नावाचा प्रकार अंगाला चिकटून बसलेला. वातावरणात फक्त पाऊस आणि पाऊस. सगळं जग नष्ट झालंय आणि सगळीकडं फक्त पाऊस उरलाय, असं फिल देणारा अॅम्बियन्स...पंधरा-वीस किलोमीटरच्या स्पीडनं अशी बाईक मारताना डोकंही आपोआप थंड होत गेलेलं. विलक्षण शांतता शरीरात भरू लागलेली. पावसाच्या प्रत्येक थेंबागणिक मेंदूतले विचार क्षीण होत गेलेले. समाधीबिमाधी वगैरे तत्सम प्रकारचा हा अनुभव...अचाट. अफाट. फक्त पाऊसच आणि तोही महाबळेश्वरसारखा पाऊसच देऊ शकेल असा अनुभव...

पुढचे दीड-दोन तास कसे गेले कळलं नाही. जसा वेगानं सुरू झाला, तसाच तो कोसळत राहिला...वाटेत थांबून थांबून ही ध्यानस्थ अवस्था अनुभवत राहिलो...दोनेक तासांनी जोर किंचितसा उतरल्यावर भान स्थिरस्थावर होऊ लागलं. स्वप्नामधून कुणीतरी अलगद उठवत असल्याची जाणिव होऊ लागली. महाबळेश्वरच्या मुख्य चौकापर्यंत आपण पोहोचलोय, हे कळण्याइतपत मेंदू जागा झाला...

Wednesday, July 21, 2010

चंद्राच्या जाळ्यात अडकला अशोकाचा मासा!

चंद्राबाबू नायडूंना जे करायचं होतं, ते त्यांनी केलं. पुरेपूर वसूल केलं. पडद्याआड गेलेल्या या 'सायबर लीडर'ला अख्ख्या नॅशनल मीडियानं डोक्यावर घेतलं. आंध्रातल्या नायडू समर्थकांनी आंदोलनं केली. चंद्राबाबूंना जे हवं ते सगळं सगळं मिळालं.

गमावलं ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी. अशोकरावांसोबत फिरणाऱया दीडशहाण्यांनी. चंद्राबाबूंना 'आत टाकण्याचा' विनोदी सल्ला देणाऱया प्रशासकीय चमच्यांनी.

समजा चंद्राबाबूंना नसतं 'आत टाकलं', तर काय घडलं असतं?

घडलं काहीच नसतं. ते आले असते आणि काहीच विरोध होत नाहीय, हे पाहून चडफडत गेले असते. नको तिथं 'अॅग्रेसिव्हनेस' दाखवण्याचा 'शहाणपणा' अशोकरावांना कधी नव्हे ते सुचला आणि अडचण पदरात पाडून घेतली. अशोकरावांवर वेळ इतकी वाईट आली, की चंद्राबाबूंसाठी खास विमाने मागवून त्यांना सोडायची पाळी आली. इतका राजकीय वेडगळपणा महाराष्ट्राच्या अख्ख्या इतिहासात कुठल्या राजकीय नेत्याने कधी केला नसेल.

मला एक भन्नाट कल्पना सुचली. चंद्राबाबूंना प्रसिद्धी मिळवायची होती नं? तीही मिळवून देता आली असती आणि महाराष्ट्राची इमेजही ठाकठीक राहिली असती. चंद्राबाबू 'आयटी सीएम'. महाराष्ट्र आज देशात आयटीमध्ये आघाडीवर जाण्याच्या (किमान) गोष्टी(तरी) करतो आहे. चंद्राबाबू आंदोलनासाठी येणार म्हटल्यावर महाराष्ट्रानं खरंतर या नेत्याचं तुफान स्वागत करायला हवं होतं. छान कमानी उभारून ठेवायला हव्या होत्या. त्यांनी महाराष्ट्रात पाऊल टाकताच, त्यांचं ओवाळून स्वागत करायला हवं होतं. जे काही दोन टीएमसीचं भुरटं धरण (खरंतर बंधारा) त्यांना पाहायचाय, तिथंच मंडप बांधून ठेवायला हवा होता. या मंडपात महाराष्ट्रातल्या टॉपच्या आयटी बॉसना आणि सेक्रेटरिएटमधल्या लोकांना तिथं बोलवायला हवं होतं. बंधाऱयाच्या बरोबरीनं 'इंडस्ट्रि'वरही चर्चा करूया, असं बाबूंना सुचवता आलं असतं.

बाबूंचा स्वभाव ज्यांना माहितीय, ते सांगू शकतील, की अशा चर्चेला बाबू रात्री झोपेतून उठवलं तरी तयार असतात. शेतकऱयांचा प्रश्न तर सोडवूच; शिवाय इंडस्ट्रीच्या वाढीसाठीही काही करूया, असं आवाहन बाबूंना केलं असतं, तर चंद्राबाबू हिरो बनू शकले नसते.

महाराष्ट्राची सध्याची प्रशासकीय यंत्रणा म्हणजे बाजारगप्पावीर आहेत. धोरण, मुत्सद्दीपणा या गोष्टी त्यांच्या अंगाला हजार योजने दुरूनही स्पर्शून गेल्या असतील, असं मानण्याची संधी अगदी क्वचित मिळते. कुठलाही प्रश्न येवो, अत्यंत घाईने, मुर्खपणाने आणि बालिशपणाने मुद्दा हाताळणे, ही त्यांची खासियत बनली आहे. अख्खं जग प्रत्येक प्रश्नाचा 'जरा हटके' विचार करून पाहते, वेगळ्या पद्धतीनं उत्तर मिळविण्याचा प्रयत्न करते आणि महाराष्ट्र मात्र 'हटके' विचारांपासून फटकून वागतो आहे. चंद्राबाबू उद्या आंध्रच्या आणि नंतर देशाच्या राजकारणात पुन्हा झळकू लागले, तर त्याचं 'श्रेय' सर्वश्री अशोकराव आणि त्यांच्या सल्लागारांच्या वेडेपणाला असणार आहे !!!

Thursday, July 15, 2010

लख्ख हसा आणि 'वीकली रोड शो' टाळा !

हसण्यात गंमत आहे. हसवण्यात गंमत आहे. कुणाच्याही चेहऱयावरचं हसू पाहण्यातही गंमत आहे. हसण्यानं नाती जुळतात. हसण्यातून नाती वाढतात. आज सकाळची गंमत. एरव्ही हाणामारीचा प्रसंग. तू-तू, मी-मी होणारच होतं. शिव्यांची लाखोली उगवणार होती. सकाळ-सकाळी नसता ताप डोक्यात घुसणार होता. सारं टळलं. सारं सारं. एका हसण्यानं. आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलं. म्हणून अप्रूप...

प्रसंग असा होता:
बाईकवरून तंद्रीत निघालो होतो. ऑफिसची वेळ गाठायची होती. नेहमीप्रमाणं ट्रॅफिक तुंबलं होतं. जिथंतिथं तुंबलेल्या ट्रॅफिकच्या धुराचा वास कोंडलेला. डोक्यावर उन्हं. एेन जुलैच्या मध्यावर सकाळी दहाच्या वेळेसच रणरणतं उन्हं. अधून-मधून विनाकारण वाजणारे कर्कश्श हॉर्न. माणसांच्या मानसिकतेचं प्रतिबिंब त्या हॉर्नच्या आवाजातून डोकावणारं !

सिग्नल सुटला. गाड्या तिरासारख्या पुढं धावल्या. पुढच्या चौकाचा सिग्नल रेड व्हायच्या आत ओलांडायची घाई साऱयांना लागलेली. मीही त्यातलाच. सुस्साट सुटलेली बाईक कच्चकन ब्रेक लावून थांबवली ती पुढचा सिग्नल रेड लागला म्हणून. मी अचानक थांबलो, तसेच पॅरलल गाड्याही थांबल्या. सगळे माझेच भाऊबंद. थांबल्याच्या क्षणानंतर दोन सेकंदात मागून धाड्कन धडक बसली आणि मी जवळपास पुढे उडालोच. कोसळलो नाही इतकंच. बाकी सगळं झालं. धडपडलो. आणि सगळा राग त्या क्षणी डोक्यात साठून आला. इतकी तिडिक की मी मागंही नं पाहता बाईक भर सिग्नलला स्टॅंडवर लावली आणि उतरलो. मागं पाहिलं; तर साधारण माझ्याच वयाचा, माझ्याच सारखा खांद्याला लॅपटॉप अडकवून चाललेला आणखी एक 'नोकरधारी' !

आता याला सोडायचं नाही, या विचारात गाडीची काही मोडतोड झालीय का पाहात त्याच्याकडं वळलो.

त्यानंही गाडी लावली. मी किंचितही न दुखावलेले इंडिकेटर चेक करत असताना 'नोकरधारी'नंही गाडी तश्शीच लावली आणि माझ्याकडं येताना दिसला. मी वाकून जणू राग वाढवत गाडी चेक करत असताना खांद्यावर अलगद हात ठेवला गेला. 'आय एम सॉरी...', 'नोकरधारी' लख्ख आवाजात म्हणाला.

मी मागं पहिल्यांदा सिग्नलकडं पाहिलं. अजून ४० सेकंद बाकी होते. मग सरळ उभा राहून 'नोकरधारी'ला नजर भिडवली.

चेहराभर पसरलेलं हसू, हसरे डोळे.

थक्कच झालो. भर सिग्नलला, दगदगीच्या शहरात, एक अपघात घडवूनही त्याचा चेहरा मस्त छान हसरा.

मी क्षणभर सुन्न. 'आय एम सॉरी. मला खरंच माफ करा. मला आवरली नाही बाईक. नवीन आहे नं...', 'नोकरधारी' जणू वर्षानूवर्षीचा मित्र बोलावा तसा अगदी हसऱया चेहऱयानं बोलत राहिला.

काहीच न सूचून मी गाडीवर बसलो. सिग्नल सुटला. पुढं आलो. आणि बाईक पुन्हा बाजुला घेतली. एरव्ही या अशा धडकांचे रिझल्ट ठरलेले. दोघांनीही वाद घालायचे. भरपूर. कुठले तरी राग इथं काढायचे आणि मग मार्गस्थ व्हायचे. आज काहीतरी वेगळं जाणवलं होतं.

'नोकरधारी'ही पाठोपाठ आला. माझ्या मागं थांबला. बाईकवरून उतरला. जवळ आला आणि पुन्हा लख्ख आवाजात हसत म्हणाला, 'आय एम सॉरी...'.

ना राग ना चीडचीड. चेहराभर फक्त हसू.

मलाही राहावेना. मीही हसलो. 'इट्स ओके buddy!...'

'Sure. पुन्हा पण, असं नको...!'...'नोकरधारी'चं लख्ख हसू.

बाईकवर बसून तो भुर्रकन निघून गेला.

मीही निघालो. विचारात ऑफिसही गाठलं. सगळं वेळेवर जमलं. मग जाणवू लागलं, अरे, हा नसता हसला तर? काय घडलं असतं? वीकली रोड शोच नं? याच्या एका हसऱया स्वभावानं कसला भारी बदल घडला...राग पाहता पाहता पळून गेला. एक स्वच्छ हसू आणि 'आय एम सॉरी'नं रोड शोला किती छान बदलून टाकलं. आणि आपण इतके भंपक की त्याचं नावही नाही विचारलं...

Wednesday, July 14, 2010

जन्मोजन्मीचे देणे...

सांजवेळ ढळताना
रात सारी कलताना
सय आठवांची उरी

ओले मोती होते साथी
सारे तुझेच सांगाती
आसवांची दाटी आता
उरे माझ्या गं सोबती

प्रकाशाची रेघ भाळी
किरणांची गं तू नव्हाळी
पाणावल्या डोळ्यांत आता
अंधाराची नक्षी सारी

चालताना आभाळात
हात होता तुझा हातात
झाला चांद पोरका आता
वनवास चांदण्यांत

तुझा भास खुणावे
आण तुझी सतावे
जन्मोजन्मीचे देणे आता
कोण्या जन्मी फिटावे?

Monday, June 21, 2010

अधांतरी ओळी...

काही ओळी मनात कुठून तरी उगवतात.
या उगवण्याला ना कुठला आधार असतो,
ना या ओळी कुठं जाणाऱया असतात.
अशाच अधांतरी उगवलेल्या या ओळी.
न जाणो कधीतरी पूर्णही होतील...


तिच्या संगाचा ध्यास
झालं आभाळ उदास
नको किरणांचा शालू
नको रवीचा पदर
तिच्या संगाचाच ध्यास...

Friday, May 7, 2010

आजच्या दिवसापुरतं अध्यात्म...

आता जे काही झालंय, ते होऊ दे. त्याचा विचार आता नको. आता पुढचा विचार करू. घडलं, ते हातात नव्हतं. घडणार आहे, ते बदलणं हातात आहे. मग घडून गेलं, त्याचा विचार किती आणि का करायचा? नाही का?

थोडंसं अध्यात्मिक वाटेल. बुवाबाजी नव्हे. अध्यात्मिक. आणि अध्यात्मिकता जड-बोजड नसते. आत्म्याशी रिलेटेड असते. आत्मा असतो का नसतो, हे वाद जाऊ दे खड्ड्यात. हायपोथेटिकली आत्मा आहे, असं धरूया. या आत्म्याला ठेच लागेल, त्याला दुःख पोहोचेल, ते वाईट. ते घडलं. आत्म्याला ठेच लागली. आता पुढं काय...? ही ठेच कवटाळून बसायचं की खपली धरू पाहायची? खपली धरू पाहायची तर झालं, ते न विसरता पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. परत ठेचकाळता कामा नये, हे लक्षात ठेवलं पाहिजे.

हे बघ, माझं अध्यात्म हे अध्यात-ना-मध्यात असं नाहीय. मला, माझ्या आत्म्याला, जे पटेल, ते करणं म्हणजे अध्यात्म. त्याला पटत नसताना जे जे करावं लागतं, एक प्रोफेशन म्हणून, ते ते शक्यतो रिपीट न करणं, म्हणजे मानसिक शांती, ही सोपी व्याख्या.

तुला पटली, तर वापरून बघ. नाहीतर दे फेकून. तुझाही आत्मा असेलच ना? की तोही विकायचा विचार आहे आता? किंचित परखड वाटेल. किंचितच. पण, ते बोललं पाहिजे. जगतो कशासाठी रे आपण? फक्त पैशासाठी का? मग तुझा श्वास ठेवतो नं दाबून. त्याएेवजी देतो पैसे. चालेल का? किंवा असं कर पुढचे वर्षभर तोंडावर हासू येता कामा नये. रडवा, सुतकी चेहरा करून बस. त्याएेवजी देतो पैसे. चालेल का? एकदाही तुझ्या चेहऱयावरची सुरकुती हालता कामा नये बघ.

अरे, खूपशा गोष्टी आहेत जगात. ज्यांची 'किंमत' पैशात नाही करता आलेली अजून. अॅडम स्मिथला देखील करता आली नाही. मार्क्सचा तो विचार होता. त्यालाही झेपलं नाही. प्रत्येक गोष्टींची किंमत पैशात होत नसते...

झाल्या गोष्टींचा विसर पडू न देता नव्या शिक. पैशाशिवाय जगात अनेक गोष्टींना असते ती किंमत समजून घे.

आजच्या दिवसापुरतं बास झालं...!

Monday, April 19, 2010

भाकड महिन्याचे लिखाण

हा महिना खूप भाकड जातोय. म्हणजे खूपसं मनात साचतंय, पण लिहायलाच होत नाहीय. हे म्हणजे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशा जाहिरातीसारखं झालंय.

होऊ दे.

आज प्रयत्न करणार आहे. नेटानं. अख्खा महिना भाकड म्हणजे काय? असं नको व्हायला. माझ्यापेक्षा जास्त काम शशी थरूरला नक्कीच होतं. तरीही बेट्यानं ट्विटींग नेटानं केलं. खड्ड्यात गेला, तरी नेट काही कमी पडला नाही. तर मला त्याच्यापेक्षा कमी काम नक्कीच आहे. त्यामुळं आजपासून परत काहीतरी लिहायचं हे नक्की.

आता बघता बघता इतकं तर लिहून झालंच की. दिसामाजी काही लिहित जावे, हे काही सोपं नाही, हे लक्षात येतं. पेपरवाले दिवसचे दिवस इतकं लिखाण कसं पाडतात कोण जाणे.

बरं झालं, पेपरमध्ये नाही गेलो ते. नाहीतर लिहून लिहून माझाच किस पडला असता. आणि ते काही आपल्याला झेपलं नसतं. म्हणजे उगाच राजकीय भोंदूगिरी करावी लागली असती. किंवा नसतीही. तरीही ते काही आपल्याला जमलं नसतं.

नाही जमलं, तर बरंच झालं की.

पण, मला हा नेहमी प्रश्न पडतो, की आपण लिहितो कशासाठी? लिहिणं ही उर्जा आहे का?

किती विचित्रं आहे नाही?

उर्जेचा नियम असा, की ती वापरली की कमी होते.

लिखाणाबाबत उलट. ते एकदा का मनातनं बाहेर टाकलं, की आणखी तयार व्हायला जागा होते. रिचार्ज म्हणा वाटल्यास.

म्हणून बहुदा आपण लिहितो.

पण, लिहितो तेही छानच. हा एक मोठा फरक आहे, आपल्यात आणि प्राण्यांमध्ये. तशी अनेक साम्यं आहेत आपल्यात आणि प्राण्यांत. पण, फरक करायला गेलो, तर जरा अवघड होतं. फरक खूप कमी मिळतात...!!

जाऊ दे.

भाकड महिन्यात काही तरी भाकड लिहिण्यापेक्षा थांबलेलं बरं...

Saturday, April 3, 2010

|| मी शोधतोय... जगण्याचं सातत्य ||

खूपदा आणि अनेकदा
अलिकडं सततच
तुझ्यासह आणि तुझ्याशिवाय

|| मी शोधतोय...
जगण्याचं सातत्य || 


गुढार्थांच्या प्रवासात
अनर्थ लाभताना
तुझा हात आणि साथ
दोन्ही सुटताना

|| मी शोधतोय...
जगण्याचं सातत्य || 



क्षणांचे साक्षिदार
फितूर होताना आणि
आपलेच दात सुळ्यासारखे
रुतताना गळाभर
आठवतो तुझा रुद्र स्वर
हवेत अलगद विरताना

|| मी शोधतोय...
जगण्याचं सातत्य || 



कित्येकदा जाणिव बधीर
होताना अन् बंधमुक्त
होऊनही पक्षी पिंजऱयात
परतताना कारणमीमांसा
वर्ज्य असते...तरीही

|| मी शोधतोय...
जगण्याचं सातत्य || 

Thursday, March 25, 2010

दादा का खवळलं...?

आता दादा जाम खवळलं.
'च्यायला, हे त्या बेण्याचं काम असणार...बंदोबस्त कराय पाह्यजे.'
दादांच्या डोळ्यासमोर फक्त दाढी होती.
'गळ्यात गळे घाल्तोय आणि इकडं हात मारतो...'
दादा विचारात बुडाले.
पुण्याचं काहीतरी सहारानं घेतलं हे दाढीचंच काम, हे दादांनी पक्क मनावर घेतलं.
'पुण्याचं काहीही कोणीतरी दुसराच घेतोय म्हंजे काय? आपला वट कमी झाला की काय...?' दादांच्या मनात शंकेनं ठाण मांडलं.
झालं. दादांनी खबरे सोडले, सहारावर पहारा आणि दाढीतल्या केसांची खबर पाह्यजे म्हणून.
पाह्यजे म्हंजे पाह्यजेच.
भागातले वट्ट पैलवान निवडून निवडून दादांनी दम देऊन आणि दम भरून दिले पाठवून.
या पैलवानांनी दादांना सादर केलेला रिपोर्ट:
१. महुंजेतली जागा आपल्या हातनं जाणार. दाढीनं कायतरी केलंय. तिथं बाहेरची पोरं आणून बशिवणार. जागा मोठ्ठी हाय. दोन-चार टाऊनशीप विस्कटल्या असत्या. हातनं गेल्या.
२. पिंपरीच्या हद्दीतल्या हॉटेलवाल्यांना धरलं पाहिजे. त्यांच्याकडं गर्दी होणार. त्यांची फी वाढवायला लागणार. म्हापौरांशी बोललं पाह्यजेल.
३. शिलाईचं काम बाहेर गेलं. मतदारसंघात काय मिळणार नाय.
४. टॅंकरचं काम बाकीय. त्यावर हात मारायला पाह्यजेल.
५. दाढीचंच काम ह्ये सगळं. आपल्या पायात पाय घाल्तंय ते. आपल्या कबड्डीला रुप्पया दिला नव्हता त्यानं. फुक्टात घशात घातलीय त्यानं आपली जागा दुसऱयाच्या. सोडला नाय पाह्यजेल.
६. नोकऱयांचं काय जमणार नाह्ये इथ्थे. खाऊन संपवलंय सग्ळं.

(दादा सारखं भविष्याचं सांगत असतात. काय करायला पाह्यजे, एवढं सांगा, हा दादांचा आदेश. काय चाललंय, ते दिसतंय की, असं त्यांचं मत.)

Tuesday, March 16, 2010

'हॉर्न टेस्ट' आणि स्वभावविशेष

भर उन्हात सिग्नलला ट्रॅफिकने चोंदून भरलेल्या चौकात शांत मनानं उभं राहणं अशक्य नाही...!

हा प्रयोग केला आणि तो भलताच सक्सेस झाला. नवीन शोध लागला. या अशा वातावरणात एक संगीत असतं आणि या संगीतावरून अनोळखी व्यक्तींच्या स्वभावाचा अंदाज बांधता येतो...!!

पटत नाही?

ही 'हॉर्न टेस्ट' म्हणा वाटल्यास.

कोण कसा हॉर्न वाजवतोय, हॉर्नचं बटण कितीदा किती अस्वस्थतेनं पिळतोय, यावरून त्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज करणं सोप्पं आहे.

या काही टीप्स:
१. सिग्नलला सगळ्यात शेवटी असूनही पीर्र पीर्र पीर्र किंवा क्विक् व्किक् क्विक् करत उभा असणारा किंवा असणारी व्यक्ती ही नेहमी स्वतःला असुरक्षित समजत असते. आपल्याला एकटे टाकून सगळे निघून जातील, या भीतीनं लहान मुल जसं किरकिरतं तशा असतात या व्यक्ती.

२. लेनमधून सगळी वाहनं सावकाश जाताहेत. अशावेळी प्रत्येक वाहनाच्या मागं जाऊन ओव्हरटेक करण्यापूर्वी टीर्र टीर्र टीर्र असा हॉर्न देत जाणारी व्यक्ती ही बहुदा एच.आर. किंवा व्यवस्थापन क्षेत्राच्या लायकीची. प्रत्येकाचं लक्ष वेधत पुढं जाण्याची तिची किंवा त्याची खोड.

३. सुस्साट वेगानं जाताना हॉर्नवरचं बोट क्षणभरही न काढणारी व्यक्ती ही पुढारीपणाचा आव आणणारी जाणावी. सगळ्यांच्या पुढं, सगळ्यात पुढं तेही गावभर बोंबलत. हा असतो या व्यक्तीचा स्वभावविशेष.

४. पाचशे मीटर अंतरावर ट्रक असला, तरी दर सेकंदाला हॉर्न देत कोणी निघाला किंवा निघाली असेल, तर समजा की ही व्यक्ती बँकेत, एलआयसीत किंवा सरकारी नोकरीत आहे. अतिशय सुरक्षित जगायचं असतं अशांना.

५. कुठूनतरी लयबद्ध हॉर्न एेकू येतो. टीटीट्टीटी टीटीट्टीटी टीटीट्टीटी असा अगदी सुरात. अशी माणसं मार्केटिंगमध्ये यशस्वी होऊ शकणारी. क्वचित संगीताचीही आवड असलेली. जे काही करायचं, ते सुरात. स्वतःची छाप उमटवत. असा त्यांचा खाक्या. त्यांचे कपडेही झकपक असतात बहुतेकवेळा.

६. पिळका आणि वाजला न वाजला असा हॉर्न एेकला, तर समजा की माणूस घाबरट, जपून जगणारा, कुणाच्या अध्यात न मध्यात आयुष्य काढणारा असा आहे.

७. सिग्नलला किंवा कुठेही सगळी वाहने शांत उभी आहेत. आणि अशावेळी मागून हॉर्न वाजवत पुढं घुसण्याचा प्रयत्न कोणीतरी करतेय. तो हॉर्न एेका. कीर्रकीर्रर रीर्र कीर्रकीर्रर रीर्र असा सूर असेल. या व्यक्तींना पुढं पुढं करण्याची हौस फार. बारसं ते बारावं अशा कुठल्याही कार्यात या व्यक्ती हिरहिरीनं पुढाकार घेतात.

८. लहान तोंडी मोठा घास अशी एक मराठी म्हण आहे. नको तिथं नको ते बोलण्याची काहींना खोड असते. बढाया मारण्याचा स्वभाव हा. ट्रकसाठीचा हॉर्न बाईकला बसवून रस्ते दणाणून सोडणाऱया व्यक्ती या अशा प्रकारातल्या.

आणखीही काही स्वभावविशेष तुम्हालाही उमगले, तर मलाही सांगा...!!

Tuesday, March 9, 2010

'हे वेळ घालवणं नाहीय...'

ऑस्करचा सोहळा सोमवारी टीव्हीवर डोळे भरून पाहिला. मला मनापासून आवडतो हा सोहळा. 'अॅन्ड द विनर इज्'चा आवाज लॉस एंजल्सच्या त्या खचाखच सभागृहात घुमता क्षणी होणारा टाळ्यांचा कडकडाट...त्यानंतर येणारा भावनांचा पूर...हे सारं काही पाहण्यासारखंच असतं. अनुभवण्यासारखंच असतं.

यंदाच्या सोहळ्यातलं एक भाषण माझ्या मनावर ठसलं. अगदी खोलवर रुतलं. म्हणून ही पोस्ट.

मायकेल गियाच्चिनो याला 'अप' चित्रपटातील सर्वोत्तम म्युझिकबद्दल (ओरिजिनल स्कोअर) ऑस्कर मिळालं. त्यानं ऑस्करची बाहुली स्विकारताना पन्नास-साठ सेकंदात मांडलेले विचार जगभरातल्या पालकांना, भल्या-भल्या शिक्षण तज्ज्ञांना आत्मचिंतन करायला लावणारे आहेत.

मायकेल म्हणाला...
'मी नऊ वर्षांचा होतो, तेव्हा बाबांना विचारलं, 'तुमचा मुव्ही कॅमेरा मला मिळेल? तुमच्या ड्रॉवरमधला तो जुना कॅमेरा..?' बाबा म्हणाले,'नक्की. घेऊन टाक.' मी तो कॅमेरा घेतला आणि मुव्हीज् बनवायला सुरूवात केली. शक्य तितकी नवनिर्मिती करण्याचा माझा प्रयत्न होता. आणि आयुष्यात एकदाही माझे आई-बाबा मला म्हणाले नाहीत, की अरे, हे काय करतोयस? कशाला वेळ घालवतोयस...?. नाही. एकदाही असं म्हणाले नाहीत. मी मोठा झालो. मला शिक्षक मिळाले. सहकारी मिळाले. अशी लोक मिळाली, ज्यांनी एकदाही माझ्या कामाला, 'वेळ घालवणं' म्हटलं नाही...त्यामुळं जे काही मी करत गेलो, ते माझ्यासाठी अगदी ओके होतं. या जगात अशी अनेक चिमुकली आहेत, ज्यांना ही सपोर्ट सिस्टिम नाहीय. त्यांच्यासाठी मी सांगतोय. तुम्ही मला एेकत असाल, तर लक्षात ठेवा. तुम्हाला नवनिर्मिती करायची असेल, तर उठा आणि काम सुरू करा. हे 'वेळ घालवणं' नाहीय...करून पाहा. ओके?'

मायकेलचं हे भाषण कोरून ठेवावं असं आहे.

Saturday, March 6, 2010

निखळ आनंददायी...बुक थेरपी

खूप छान कविता वाचली, की मन प्रसन्न होतं.
ग्रेसच्या एखाद्या ओळीचा नव्यानं अर्थ उलगडला की छान वाटू लागतं.
नेमाडे, गौरी देशपांडे यांच्यासारखं कोणी हाताला लागलं, तर पुस्तक पूर्ण संपवूनच उठावसं वाटतं.
आठ-पंधरा दिवस काहीच नवं वाचलं नाही, तर अस्वस्थ होऊ लागतं.
एखादी गोष्ट मनात इतकी साठून राहते, की लिहून काढल्यावरच चैन पडतं...

हे काय आहे? असं का होतं...?

परवा सर्फिंग करताना मिळाली या प्रश्नांची उत्तरं. मी काटेकोर डॉक्टर टाळणारा. शक्यतो डॉक्टरची पायरी नकोच, या मताचा. तरीही अॅलोपथीपासून म्युझिक थेरपीपर्यंत काही ना काही गोष्टींची किमान माहिती आहे. सामान्य ज्ञान म्हणा हवं तर.

पण, नव्हती ती 'बुक थेरपी'ची माहिती.

अशी थेरपी खरेच आहे. बुक थेरपी. विशेषतः मानसोपचारातील ही महत्वाची पद्धती आहे. गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना मार्गावर आणण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. अर्थातच, मला मिळालेल्या लिंकवर आणि त्यानंतर केलेल्या सर्चमध्ये बुक थेरपी अधिकाधिकरित्या शालेय विद्यार्थ्यांसाठी वापरण्याबद्दल मार्गदर्शन होतं. तरीही, ही थेरपी आपणही अधून मधून स्वतःच्या नकळत वापरत आहोतच, हेही हळू हळू लक्षात येत होतं.

कंटाळलेल्या, मरगळलेल्या मनाला उभारी आणण्याचं काम प्रेरणादायी पुस्तकं करू शकतात. निराश झालेल्या मनांमध्ये आशेची ज्योत पुस्तकं करू शकतात. अडचणींवर मात करण्याचं कसब पुस्तकांतून मिळविता येतं. आव्हानांना सामोरं जाण्याचं धैर्य पुस्तकातून हाती येतं. दुखावलेल्या मनावर फुंकर पुस्तकं घालू शकतात. डोक्यात घट्ट घुसून घर केलेल्या ताणाला झटक्यात पळवून लावण्याचं कामही पुस्तकंच करू शकतात...

बुक थेरपीचे असे अनेक फायदे.
साईड इफेक्टस् शून्य.

मग जाणवलं, 'रामायण', 'महाभारत', 'ज्ञानेश्वरी', 'तुकाराम गाथा' ही या बुक थेरपीचीच पुरातन रुपं. या महाकाव्यांनी कित्येक पिढ्यांना प्रेरणा दिली. उभारी दिली. शांती दिली. हसवलं. विचारांना चालना दिली आणि रस्ताही दाखवला...

आजही काय वेगळे आहे? आवडलेल्या पुस्तकात आपण रमून जातो, म्हणजे होतं तरी काय? ध्यानच लागतं नं आपलं? सारं काही विसरून एखाद्या पुस्तकात असं रमून जाणं हे आपल्या मनावर होत असणारे उपचार तर असतात. मनाला पुन्हा ताजंतवानं करणारे...

बुक थेरपी ही अशी पुनःपुन्हा वापरून पाहावी अशी असते...

Friday, March 5, 2010

पगारवाढीच्या प्रतिक्षेतल्या कर्मचाऱयांसाठी...!!!

तमाम कर्मचारी वर्गासाठी मार्चमध्ये अत्यंत उपयुक्त:



Thursday, March 4, 2010

बाप होण्यात सुख आहे...

बाप होण्यात सुख आहे. मुल लहान असताना त्याच्या वाढीत भाग घेण्यात खरंच सुख आहे. हो, एखादा क्षण येतो, की 'काय हे कार्ट दंगा करतंय,' असं वाटतं. तिरमीरीत क्वचित हातही उगारला जाईल. पण, त्याच्या चिमुकल्या लुकलुकत्या डोळ्यात पाहिलं, की हात थिजेल. रागात उचललाच हात, तर तो मऊसूत गालावर मुलायम फिरेल...
...बाप होण्यात हे सुख आहे.

माझ्या पिल्लूशी मी रोजच नाही खेळू शकत. खूपदा होतं असं की मी पोहोचतो, तेव्हा तो पेंगुळलेला असतो. तरीही उठतो आणि गुदगुदल्यांना गुदगुदल्यांनीच प्रतिसाद देतो! त्याचं खळखळून हसणं बारा-चौदा तासांचा ताण कुठंच्या कुठं पळवून लावतं. अगदी अगलद पळवून लावतं....
...बाप होण्यात हे सुख आहे.

त्याचं निरागस प्रश्न विचारणं आणि विश्वासानं खांद्यावर झोपून जाणं केवढातरी आत्मविश्वास देते. 'त्याला चंदामामा म्हणायचं, तर तो आईचा भाऊ ना रे? मग आई इथं आणि तो तिथं कसा रे?', असल्या प्रश्नाला उत्तर देताना बाबाची उडालेली भंबेरी त्याला कधी कळत नाही...! त्याला कधीच हे माहिती नसतं, की आपल्या अशा कृतीतूनच बाबाला मिळतेय उर्जा...बाप होण्यात हे सुख आहे.

त्याला टाईम मॅनेजमेन्ट, स्ट्रेस मॅनेजमेन्ट, शेड्युल वगैरे वगैरे शब्द अजिबात ठावूक नाहीत. तरीही, बाबाबरोबर मिळालेला वेळ जास्तीज जास्त एन्जॉय कसा करायचा, हे त्याला समजलंय. कुणीही न शिकवता. ही उपजत समज त्याला कुठून आली, हा प्रश्न तो झोपला की नेहमी पडतो. भणाणारं आणि ऑफिसच्या विचारानं शिणलेलं डोकं मस्त शांत करून जाणारा पिल्लूचा सहवास...
...बाप होण्यात हेच खरं सुख आहे.

Monday, March 1, 2010

सूर्यास्ताचा अटळ उत्सव...


सूर्यास्त मला नेहमी कासावीस करतो.

हुरहूर लावतो.

काहीतरी हातातून निसटतंय, आयुष्यातून दूर चाललंय ही भावना सूर्यास्ताच्या क्षणी मनात घर करू लागते. पश्चिम क्षितिजापासून हातभरावर सूर्यगोल आला, की मी नदीच्या त्या उंच टेकाडावर विसावतो. ही माझी आवडती जागा. सूर्यास्ताचा अटळ उत्सव पाहण्याची. या उत्सवाची रेघ न् रेघ आणि कण न् कण मनात साठवायची आस लागते. आभाळात पांढुरक्या ढगांची दाटी असेल, तर सूर्यास्त म्हणजे रंगांचा सोहळा बनतो. लाल-तांबड्या रंगाच्या अक्षरशः अगणित छटांचा मनसोक्त कॅनव्हास होतो. नारिंगी, केशरी, भगव्याची उधळण सुरू होते.
पाहता पाहता तेजोगोल डोंगराआड जायला लागतो.

कासावीसपणा सुरू होतो, तो इथं.

त्याचं इंच-इंचानं डोंगराआड रुतत जाणं मनांत विलक्षण कालवाकालव सुरू करतं.
आता एक कोर तेवढी राहलीय. दिवसाच्या प्रकाशाची ही शेवटची खूण. आभाळ रंगांनी न्हावून गेलंय आणि ही कोर सगळं काही आवरून जायच्या तयारीत आहे. ती कोर दिसेनाशी झाली की एक हलकीशी थंडगार झुळूक नदीवरून सुटते. जणू काही, 'सूर्य गेला...' हा सांगावा आणते. झुळूक नव्हेच ती. ती तर कुजबूज...त्याचक्षणी आकाशात एक काळीभोर रेघ उमटू लागते. हळू हळू ही रेघ पुढं पुढं जाऊ लागते. वटवाघळांचं चित्कारणं मधूनच कानावर पडायला लागतं. प्रकाशाचा पसारा आटपू लागतो, तसं आकाशभर या भेसूर पक्ष्यांची दाटी व्हायला लागते. कुठंतरी दूरवर त्यांचा प्रवास सुरू झालेला असतो.
नदीत अर्ध्याअधिक बुडून बसलेल्या म्हशी या अंधारयात्रींच्या चाहुलीनं अंग झटकत बाहेर पडू लागतात. आपापल्या गोठ्यांच्या दिशेनं न बोलता त्यांची चाल सुरू होते.
सारेजण परतीच्या प्रवासाला लागतात. मुक्कामाच्या प्रवासाला.

ही सारी कातरवेळ. करकरीत तिन्हीसांज.

सूर्य बुडालेला. अंधार अजून कब्जा करायचाय. आकाशात वटवाघळं. आसमंत शांत. मन कातरतं. आठवणींनी व्याकूळ होतं. कुणाच्या कुणाच्या आठवणींची दाटी मनात व्हायला लागते. सुटलेला हाताचा स्पर्श नेमका हाच क्षण पकडून जाणवायला लागतो...एकानंतर दुसरी. दुसऱयात तिसरी..त्यातच गुंतलेली चौथी...आठवणींची अनंत साळखी ओवली जाऊ लागते...
'उद्या परत हाच सूर्यास्त आहे. असाच आहे अगदी,' असं कॉन्शस मन कुठंतरी करवादत असतं. पण, सबकॉन्शस ते काही एेकायला तयार नसतं. आठवणी आणि आठवणी. गुदमरायला होतं. त्यातून सुटायसाठी तडफड सुरू होते. प्रत्येक तडफड आठवणींचा कासरा अधिकच आवळते. कासावीसपण तीव्र होऊ लागतं. डोळे घट्ट मिटले, तरी ओघळणारा अश्रू फट शोधून बाहेर येतो...
निग्रहानं डोळे उघडू लागलो, की अंधारलेलं दिसू लागतं. मनाचा हिय्या करून उठतो. सबकॉन्शसचं भूत आता उतरू लागलेलं असतं. मनाला आलेला थकवा जाणवू लागतो. पाय उचलून घराची वाट धरतो...सूर्यास्ताचा अटळ उत्सव मनावरची पकड सैलावतो. गल्लीपर्यंत पोहचेतो कॉन्शस झालेला असतो. शांतपणा परतलेला असतो...

सूर्यास्ताचा अटळ उत्सव असं मनाला उलथंपालथं करतो. खळबळून काढतो. तरीही हवासा वाटतो....

म्हणूनच तर दुसऱया दिवशी बरोबर त्याच टायमिंगला मी त्याच जागी आलेलो असतो...

Friday, February 26, 2010

बजेट, तज्ज्ञ आणि सदामा

प्रसंग क्रमांक एक:

पॉश (म्हणजे टीव्हीवर तरी...) दिसणाऱया केबिनमध्ये चर्चा सुरूय.
बजेटची. बजेट २०१० असं काहीतरी सारखं इकडून तिकडं धावतंय. टीव्हीवर चर्चा चाललीय. तज्ज्ञ आणि अँकरमध्ये. विषय अर्थातच बजेट आणि मी अर्थातच एक प्रेक्षक.

'तर सर, मला असं वाटतं, की यावर्षीच्या बजेटमध्ये फिस्कल डिफिशिएटवर जास्त प्रोग्रेस आहे. नाही का?'

'येस सुनील. इव्हन आय थिंक की एकाचवेळी छान बॅलन्स साधताहेत फायनान्स मिनिस्टर. फिस्कल डिफिशिएटवर आणि फार्मर्स म्हणजे रूरल इंडियावरही त्यांचं लक्ष आहे. त्यासाठी ते स्ट्रॉंग एफर्टस् घेताहेत.'

'सर, रुरल इंडियाचा विषय निघालाच आहे, तर फार्मर्स आणि रुरल इंडियासाठी बजेटमध्ये काय आहे, असं तुम्हाला वाटतं?'

'लूक सुनील. इंडिया इज् अ रुरल कंट्री. म्हणजे आपण डेव्हलपिंग आहोत. रुरल इंडियासाठीच तर सगळ्यात जास्त फ्रॅक्शन जातो बजेटचा. फार्मर्ससाठी चांगली लोन्स मिळणाराहेत नं आता. म्हणजे तसंच तर म्हटलय फायनान्स मिनिस्टरनी. खूप काही आहे बजेटमध्ये...'

रटाळ चर्चा. काहीच न समजू देणारी. बजेटमध्ये माझ्यासाठी काय, हे मला काहीच समजलं नाही. माझ्या गावाला काय फायदा, हेही काही कळालं नाही. मरू दे ते बजेट. निवांत पारावर बसू. दुपारच्या गारव्याला म्हणून येऊन पारावर निवांत विसावलोय.

तोच...
-----------------------------
प्रसंग दुसरा:

'बज्येट फुटलं गां...लई वंगाळ झालंया. ह्या ब्येण्यांनं लईच चाट दिलीया...'

सदामा किंचाळत सुटला, आणि छातीत धस्सं झालं. वाटलं, की कोणाच्या तरी डोक्यावर काहीतरी फुटलंय आणि गावात गोंधळ झालाय. सदामा धापा टाकत आला. पारावर बसला. मी हुशार (आमच्या गावात). त्यामुळं मला सगळं माहिती असणारच या खात्रीनं त्यानं गाडी सुसाट सोडली.

'दादू, आरं ह्या ब्येण्यांनी घोर केला. शेताची माती व्हणार. त्ये ब्येणं म्हणतंया जा बँकात आन् काढ कर्ज. आरं बा, पर फ्येडू कसं ते? हितं शेतात पिरवाया खत न्हायी. खत करणाराय आन्नी म्हाग. मग पेरू काय, पिकवू काय आन् विकू काय? कर्ज न्हाय काढलं, तर जगणार कसं? तरंच ते ब्येणं म्हणतया कर्ज काढ. याच्या बाच्या पोराच्या बँका हायती का?'

सदामा जाम कातावलेला...मी जाम धास्तावलेलो. मला जे बजेट कळलं नाही, ते सदामाला कळलेलं पाहून.
-----------------------------
दोन प्रसंग. आणि मला बसले दोन धक्के.

धक्का क्रमांक १ - सदामाला बजेट बिजेट कसं काय कळलं?
धक्का क्रमांक २ - सदामानं जे काही विश्लेषण केलं, ते त्या तज्ज्ञांना कसं नाही समजलं?

Thursday, February 25, 2010

इंग्रजीतले भारतीय शब्द...

इंग्रजी ही जगाची भाषा आहे. आपण नाकारलं, तरीही तिचं महत्व काही कमी होत नाही. इंग्रजी का वाढली, याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे या भाषेनं तंत्रज्ञान आणि विज्ञान आत्मसात केलं. सामान्यांपर्यंत सामान्यांच्या भाषेत पोहोचवलं. आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे या भाषेनं अन्य भाषांचा दुस्वास न करता त्यांच्यातील शब्द आपल्या भाषेत आणले. लोक बोलतात ती भाषा, हे सूत्र सांभाळले.

हिंदी/उर्दू - बंगला, करोड, डाकू, देवदार, डोंगी (लहान होडकं), दुंगारी (विजार), घी, जिमखाना, जोधपुरी, लाख, लूट, पैसा, पकोडा, राज, सामोसा, शाम्पू, तंदूरी, टमटम, वाला.
मल्याळी - बेटल, कॉयर, कोप्रा, जिंजर, टीक
मराठी - मुंगूस
संस्कृत - आश्रम, अवतार, बनिया, बनियन, बेरील्, ब्राम्हण, कार्माइन, चित्ता, शिन्त्झ, चटणी, क्रिमसन्, जगर्नॉट, जंगल, ज्युट, लॅक्वर, मॅडरीन, पंडित, पालखी, सफायर, सुट्टी, सुगर (शुगर), अहिंसा, आश्रमा, आत्मा, बोधीसत्व, बुद्ध, चक्र, गुरू, हटयोग, कर्म, लिंग, महाराज, महात्मा, मंत्र, माया, निर्वाण, राजा, राणी, सत्याग्रह, सूत्र, स्वस्तिक, यंत्र, योग, योगासन
तमिळ - कॅटामारन्, चिरूट, करी, मॅंगो, मुल्लीगटावनी (mulligatawny), पॅरीह् (pariah)
तेलुगू - बंडिकोट

ही सहज मिळालेली माहिती. कदाचित आणखीही मराठी, संस्कृत शब्द इंग्रजीत रुळलेले असू शकतील. वर दिलेले शब्द ऑक्सफर्डच्या वेबसाईटवरून घेतलेले आहेत. एखादी भाषा कशी विकसित होत जाते, याचं हे उदाहरण मानता येईल. इंग्रजांनी ज्या ज्या देशांवर राज्य केले, तेथील शब्द इंग्रजीत घेतले आहेत.

परवा गुगल बझ् लॉन्च झालं. बझ् हा शब्द अर्थवाही आहेच. गुणगुण हा त्याला पर्यायी शब्द असू शकेल. तो तितकासा लागू होईल का? की बझ् स्विकाराचा?

मराठी वाढवायची असेल, तर प्रत्येक मराठी शब्दाला पर्यायी शब्द तयार करण्यात वेळ घालवायचा, की शब्दांचे मराठीकरण करून ते वापरायचे, हा निर्णय आपल्या हातात आहे.

(चपाती हा शब्दही ऑक्सफर्डमध्ये आहे. पण, वेबसाईटवरील माहितीत त्याचा समावेश झालेला नाही. म्हणून तो घेतलेला नाही.)

Tuesday, February 23, 2010

कंपनी आणि 'कंपनी'...

संध्याकाळी मुलाला मांडीवर घेऊन गप्पा मारत बसलो होतो. त्याचं वय पाच. त्याला गप्पा मारायला आवडतात. जगातल्या कुठल्याही विषयावर. मी त्याला 'लांबड लावणं' म्हणतो. असो.
गप्पांच्या ओघात विषय निघाला मी रोज घरी उशीरा येण्याचा.
त्याचं म्हणणं, तु असा गप्पा मारताना मला खूप आवडतोस.
माझं म्हणणं, असं रोज संध्याकाळी गप्पा मारायला येणं मला कसं शक्य आहे ?
तो, 'का नाही?'
मी, 'अरे, ऑफिस नसतं का?'
तो, 'ऑफिस आईलाही असतं...'
मी, 'अरे, मला काम जास्त असतं...'
तो, 'असू दे, लवकर का येत नाहीस...?'

विषय असा रंगत गेला होता. मग, मी त्याला विचारलं, तुला इतकं कळतं, तर मला सांग मी ऑफिसातून लवकर कसा येऊ शकतो रे रोज?

त्यानं दिलेलं उत्तर मनात ठसलंय.

'ऑफिसमध्ये लवकर जात जा. वेळेवर. मी कसा स्कूलला वेळेवर जातो?, तसं वेळेवर जात जा. मी कसं टीचर सांगतील, तसं पटपट करतो, तसं तू तुझ्या टीचर सांगतील, ते पटपट करत जा. कामं पटपट संपव. मी कधी स्कूलमधून येताना स्कूलबस चुकवतो का रे? स्कूल सुटली की मी बसमध्ये बसतो. लगेच घरी येतो...तूपण तसंच कर...तुझी कामं पटपट कर रे...तुला माझ्याशी गप्पा मारायला आवडत नाही का???'

संध्याकाळी त्याच्यासोबत गप्पा मारणं खरंच इतकं अशक्य आहे का? त्यानं दिलेलं सोल्यूशन मला माझ्या कंपनीनंही किंवा आमच्या एचआरनंही कधी दिलेलं नव्हतं...

मला वाटायचं, मी माझी काम खूपच पटपट करतोय...कंपनी खूश आहे. कंपनी खूश असेल, पण ज्याला माझी 'कंपनी' खरोखरीच खूप हवीय, तो खूश आहे का?....

Sunday, February 21, 2010

सूर्यनमस्कार आणि सर

आमच्या शाळेतले सर सूर्यनमस्कार घालायला शिकवायचे. दहा सूर्यनमस्काराच्या बदल्यात मुठभर भिजलेले शेंगदाणे मिळायचे. आळस करायचो खूप आम्ही सगळे. काय हे बेणं सारखं छळतंय, असंही कधी वाटायचं. मुठभर शेंगदाणे मिळवण्यासाठी जिवाच्या करारावर सूर्यनमस्कार घालायचो. एखाद दिवशी एकही सूर्यनमस्कार न घालता शेंगदाणे मात्र मिळवायचो. रजिस्टर असायचं सरांचं. ते भरणाऱया मुलाला भीती दाखवून आमच्या नावावर सूर्यनमस्कार घालायला लावायचो. सर रिटायर्मेंटला आलेले. तरीही तुकतुकीत. झपाझप सूर्यनमस्कार घालायचे. आमच्यासोबत स्पर्धा लावायचे. आम्ही पाच पोरं मिळून जेवढे सूर्यनमस्कार घालायचो, त्याच्या दुप्पट सर बसल्या बैठकीला घालायचे.

हे सगळं परवा आठवलं. सूर्यनमस्कार नावानं राज्यभर हैदोस सुरू होता किंवा जागृती. पेपरात वाचलं. टीव्हीवर पाहिलं. डॉक्टरपासून सारे सूर्यनमस्काराचा जप करताना.

सहज प्रयत्न म्हणून सूर्यनमस्कार घालायला गेलो. पाठ वाकता वाकेना. पायातून कळ आली. ताण असह्य झाला. एक सूर्यनमस्कार म्हणून पूर्ण झाला नाही.

शाळा खरंच खूप छान असते. शाळेत असताना जो त्रास वाटायचा, तो त्रास नव्हता. सर आमच्यासाठी त्रास सहन करून घेत होते. आमच्या प्रकृतीसाठी. तेव्हा समजलं नाही. आता समजलंय. फुकट शिकवत होते सर. आज सूर्यनमस्काराचेही क्लास आहेत. त्यासाठी फी आहे. ती भरून जाणारे शेकडो लोक आहेत.

सर आठवले.

डोळे पाणावले.

आता सर नाहीत.

आता ठरवलंय, सूर्यनमस्कार घालायचे. सरांच्या आठवणीसाठी. मुलांनाही शिकवायचं. सरांची आठवण म्हणूनच. त्यावेळी त्यांना परतफेड नाही करू शकलो. समजलंच नाही त्यांच दान म्हणून. आता करायची. जरूर करायची.

Saturday, February 20, 2010

म्हातारी तिथंच सुखी आहे...

परवा बोलता बोलता म्हातारी म्हणाली, आता दिस किती उर्ले रं माझं? राहू दे की सुखानं हितंच...

एक जुनाट घर. पडकं म्हटलं तरी चालेल. जोराचा पाऊस आला, तर गळत्या ठिकाणी लावायला भांड्यांची मारामार. तीन महिन्यांपूर्वी संपलेल्या पावसाळ्याच्या खुणा अजून त्या खोपटात स्पष्ट दिसताहेत. तरीही म्हातारी म्हणते, राहू दे की सुखानं हितंच...

मी म्हातारीला म्हटलेलं, चल माझ्याबरोबर. शहरात राहू. या गावात काय मिळालंय तुला...? चांगली नोकरी आहे. घरी बायको आहे. पोरं आहेत. मजेत राहशील शहरात.

म्हातारी नाही आली. मनात त्या क्षणी चडफडाट झालेला. हट्टी आहे मुलखाची. आयुष्यात कधी माझं एेकायची नाही.

शहराच्या रक्तात परत मिसळून गेल्यावर दोन दिवस विचार करतोय.

म्हातारीचं बरोबरच तर आहे, असं आता वाटायला लागलंय. तिला तिथं सुख आहे. म्हातारीनं एक बोंब मारली, तर चार घरं धावत येतील इतकी ओळख आहे. जेवायला तोशीस पडू नये, इतकी शेती. खंडानं दिलेली. खंड वेळच्या वेळी येतोय. म्हातारीला काही त्रास नाही. दुखलं-खुपलं तर बघायला कोणी जवळ नाही, ही आपल्याला चिंता. तिला कधी वाटलीय? नाही. दुखलं-खुपलं तरी अंगावरच काढायचं आणि अगदीच काट्याचा नायटा झाला, तर डाग्तराकडं जायचं, ही तिची रित.

खोकल्याची किंचित उबळ मला डॉक्टरकडं पळवते. किंचितसा घाम छातीत धडकी भरवतो. पेपरवाले म्हणतात तो महागाईचा भस्मासूर आमच्या घरात उठता बसता नाचतो. आणखीही खूप काही म्हातारीला जे मिळतं, ते आम्ही इथं गमावतो...

बरोबरच तर आहे म्हातारीचं. पावसाळ्याच्या चार महिन्यातली गळती सोडली, तर तिला सुखच तर आहे. आणि गळतीही चार महिने कुठं असते? जेव्हा पाऊस पडतो तेव्हाच, हे तिचं साधं गणित.

शहरात राहून गणितं चुकलेल्या मला ते कळलं. पण, परत शहरात आल्यावर...मग आज पटलं, म्हातारी खरंच सुखी आहे. तिथं आहे म्हणून. जिथं जन्मली, वाढली, तिथंच माती होण्यात तिचं सुख आहे. ते सुख मी का हिरावून घेऊ?

Friday, February 19, 2010

सगळीकडं फक्त माणसं...

अखेर मिळाला.
सापडत नव्हता. हे ट्राय केलं. ते केलं. सगळं केलं.
डोकं भंजाळलं.
तरीही सापडत नव्हता. सगळीकडं शोधलं.
मग मिळाला.
म्हणजे तसा तो मिळालाच नाही.
बदलला.
ब्लॉगचा पासवर्ड.
ई मेलसुद्धा आठवत नव्हता. आणि पोस्टची हुक्की आली होती.
अलिकडं असं सतत होतं. विस्मरण. माणसं समोर आली की लक्षात येतात. नाव अजिबात आठवत नाही. चेहरा ओळखीचा वाटतो. माणसं खूप झालीत, त्यामुळं असं होतंय का?
काहीच लक्षात येत नाही. रस्त्यावर माणसं. गर्दी. सिग्नलला खेचाखेची. ऑफिसमध्ये माणसं. मुव्हीला गदारोळ. शांत म्हणून बाहेर जावं, तर गाड्यांची ही गर्दी. सगळीकडं फक्त माणसंच माणसं. मान्य आहे हे जग माणसांचंच आहे. पण, म्हणून काय सगळीकडं अशी खच्चून भरलेली असावीत? इतकी माणसं झाली, की कदाचित त्यांची किमत कमी होते का? मलातरी तसंच वाटतंय. हे अर्थशास्त्राप्रमाणेच. पुरवठा वाढला, की किमत घसरते. माणसांचीही घसरलीय. त्यामुळं अपघातांच्या बातम्यांवर फक्त नजर फिरते. बॉम्बस्फोट झाला का, अरे रे वाईट झालं, यापलिकडं भावना सरकत नाहीत. एकप्रकारचं साचलेपण हे माणसांच्या गर्दीमुळं निबर झालेल्या मानसिकतेचंच प्रतिक आहे.
म्हणजे असं मला वाटतंय. तुम्हाला वाटायलाच पाहिजे, असं काही नाही...!

Thursday, February 11, 2010

तरीही का सांगत नाहीस आई तू आता?

आई तू
लहानपणी सांगायचीस, अरे. नीट जेव. नुस्तं उष्टावू नकोस.
आणि
आता रोजचा प्रत्येक क्षण तर मी उष्टावतोय.
तरीही का सांगत नाहीस आई तू आता?

आंघोळ मस्त करावी, मनातंच राहतं.
गिझरच्या पाण्यात भसाभस विसण जातं.
दिवसाच्या कामाची उजळणी करत
पाणी अंगावरून झरझर तर सरतं.

हीनं केलेला प्रेमाचा शिरा
पेपर चाळताना पोटात ढकलतो.
घाईनं गाडीला किक मारताना
बाय म्हणणंही विसरतो.

रस्त्यावरच्या खड्ड्यांना
घातलेल्या शिव्यांमध्ये विरून जातोय
शेजारच्या मंदिरातला घंटानाद.
एन्कमिंग पंचिंग वेळेत झालं, की
वाटतं, टळली आजची ब्याद...!

पोराचं निर्व्याज हसू पाहायला
शाळेतल्या त्याच्या गंमती एेकायला
वेळ नाही मला.
मस्त, निवांत गाणं एेकायला
एेकलेल्या गाण्यावर तान घ्यायला
वेळ नाही मला.


कुठलाच आनंद
झिरपून सुद्धा
जात नाही आत.

आता रोजचा प्रत्येक क्षण तर मी उष्टावतोय.
तरीही का सांगत नाहीस आई तू आता?

गती मंदत्व आणि चार प्रश्न

महाराष्ट्रात आज-काल जे चाललंय, ते शुद्ध गती मंदत्व आहे.
गती मंदत्व म्हणजे वेडेपणा नव्हे.
गती मंदत्व म्हणजे सारासार विवेकाने कृतीची शक्यता गमावणे. तर्कशुद्धतेचा अभाव.
'सर्वन्यायी' सेना आणि जोडेवाहू सत्ताधारी यांच्यात आलेले गती मंदत्व महाराष्ट्राची धार बोथट करतेय.
कुणी कुठे खेळावे, कुणासोबत खेळावे, कोणत्या मुव्हीमध्ये काय करावे, काय बोलावे यापेक्षा काही महत्वाचे उरलेच नाहीय का?
पेपर उघडला की तेच. पेपर मिटून टीव्ही लावला की तेच. हापिसात जाऊन इंटरनेट उघडले की तेच. काय धंदा आहे हा?

१. रस्त्यावरून जाताना मला रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. हापिसात पोहोचलो की हुश्श वाटतं.
दिवसभर (बॉस असतानाही...!) कसं सेफ वाटतं.
संध्याकाळी जणू मृत्यूच्या वाहत्या गर्दीत गाडी चालवावीशी वाटतच नाही. धाडसही होत नाही. त्यामुळं हापिसात गप्पगार पडून राहतो.
गर्दीचा पूर ओसरू लागला, की हळूच पळतो. सकाळच्यापेक्षा थोडंफार तरी सेफ वाटतं.
गाडी निट, सुरक्षितपणे चालविण्याचा आत्मविश्वास मी गमावलाय, हा प्रश्न या 'गती मंदत्व आलेल्यांनी' उभ्या केलेल्या प्रश्नापेक्षा अधिक महत्वाचा नाहीय का?

२. घरचा गॅस अचानक संपला, की पोटात गुडगुड वाजतं. हातपाय गळतात अक्षरशः. आता कसं जगायचं, गॅस कुठून मिळवायचा हा प्रश्न पडतो.
कुणा-कुणाच्या हाता-पाया पडून गॅस जोडला, की त्या लबाडालाही मी त्या क्षणाचा देव मानतो.
लबाडांना देव बनविण्यानं आलेला हताशपणा कसा घालवू, हा प्रश्न या 'गती मंदत्व आलेल्यांनी' उभ्या केलेल्या प्रश्नापेक्षा अधिक महत्वाचा नाहीय का?

३. कुणाला पटो वा न पटो. महिन्याचं बजेट खरंच कोसळतंय. चेहऱयावरचा ताण वाढतोय. भाजीचे दर वयस्कर चेहऱयावरच्या सुरकुत्यांप्रमाणे वाढताहेत.
प्रवास करताना मला रानंच्या रानं शेतीनं लगडलेली दिसतात. तरीही साखर महागतेय, भाजी परवडत नाहीय, दुध कडू झालंय.
शेतीचं हे अर्थकारण असं कसं कसंही चालतं? हा प्रश्न मला पडणारा प्रश्न या 'गती मंदत्व आलेल्यांनी' उभ्या केलेल्या प्रश्नापेक्षा अधिक महत्वाचा नाहीय का?

४. मुलाच्या शाळेत पालकसभेला जातो मी. मुलाला कसं वाढवायचं, ही चिंता तिथं प्रत्येकाच्याच मनात दडलीय. कुणी उघड मांडतंय. माझ्यासारखं कुणी त्यांच्या मांडण्यावरून ठोकताळे बांधतंय.
आत्महत्येच्या बातम्या वाचून जीव गलबलतोय. तरीही मंत्री-संत्री बिनबोभाट फिरताना दिसतात. निबर कातडीने. जडावू शरीरानं.
मुलांच्या भविष्याचं काय? हा प्रश्न या 'गती मंदत्व आलेल्यांनी' उभ्या केलेल्या प्रश्नापेक्षा अधिक महत्वाचा नाहीय का?

हे चार प्रश्न म्हणजे मध्यमवर्गीयांचं जगणं नव्हे. हे अगदी मान्य.
पण, जे प्रश्न म्हणून मध्यमवर्गीयांसमोर उभं केलं जातं आहे, ते आमचे प्रश्नच नव्हेत, हे तरी मान्य आहे नं?

Wednesday, February 10, 2010

माणसांचं घेरणं आणि एकटेपणा

माणसांनी घेरलं जाणं त्रासदायक.
माणसांशिवाय जगणंही त्रासदायक.
मध्य कसा साधायचा?
म्हणजे मला हा प्रॉब्लेम येतो. नेहमीच.
मी काही माणूसघाणा नाही. माणस आसपास असणं हे मीही मान्य केलंय.
तरीही कित्येकदा, अलिकडे तर रोजच असं वाटतं, की इतकी माणसं कुठून आलीत भोवती?
यांना काय बोलवायला गेलो होतो का मी?
मग काय करतात ही इथे? आणि तिथे? सगळीकडेच?

बरं, माणसांशिवाय मला जंगल खूप आवडतं.
तिथं एकटं फिरायला. सूर्य जागा असताना.
फिकट अंधारही बरा वाटतो.
गडद अंधारात अंग शहारतं. कोणीतरी हवंच सोबतीला, हेही वाटतं.

कदाचित असं होतंय का, की जेव्हा जेव्हा शहरच माणसांचं जंगल बनतं
आणि तेही सूर्य जागा नसतानाचं,
तेव्हाच फक्त माणसांत असणं मला हवंसं वाटतं?

Tuesday, February 9, 2010

महाराष्ट्राचे संस्कृतीरक्षण

गंमतीनं घ्या हे.
सध्या हे जे काही चाललंय, त्यावरून सुचलंय.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रालयातील नोकरभरतीसाठी प्रश्नपत्रिका:

पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या:
१. महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे काय?
- (फक्त) मुंबईत मराठी बोलणे.

२. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिक काय?
- (सोयीने यापैकी एक) मराठी भाषा, मराठी पाट्या, मराठी मेन्यू कार्ड, चित्रपटांतील मराठी, क्रिकेट.

३. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे रक्षण कोणी केले?
- ति. रा. रा. बाळासाहेब, चि. उद्धव, चि. राज या ठाकरे कुटुंबियांनी.

४. महाराष्ट्रावर इतिहासात कोणते ठळक गंभीर प्रसंग गुदरले?
- बिहारी शिरले, मराठी हरवली, पाकिस्तानी क्रिकेट खेळले, चित्रपटांचे नाव इत्यादी इत्यादी.

कशासाठी ठावूक नाही...

हे ब्लॉगिंग कशासाठी ?
ठावूक नाही.
मनातली मळमळ ओकण्यासाठी मुळीच नाही.
मनात मळमळ साचते कशाने? साचवल्याने.
आम्ही काही साचवत नाही.
साचून काही राहण्याचा प्रश्नच येत नाही.
अनेकदा डोकं भणाणतं.
मळमळ नाही; पण तळमळ वाटते. वाढते.
ही तळमळ मांडण्यासाठी.
त्यासाठी हे माध्यम.
नवं. कोरं. म्हणूनच मनापासूनचं.