Tuesday, August 30, 2011

अण्णांच्या 'क्रांती'चा अर्थ


युरोपात पहिल्यांदा राजकीय क्रांती घडली ती औद्योगिकीकरण क्रांतीनंतर. भारतात ते पोहोचलंच नाही. दुसऱया महायुद्धानंतरही राजकीय क्रांती अनेक ठिकाणी घडली. तिचा फायदा भारताला मिळाला. स्वातंत्र्याच्या रुपानं. तिसरी क्रांती घडली, ती माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात. त्यात गेल्या दोन दशकांत भारतानं आघाडी ठेवलीय. या क्रांतीनंतर स्वाभाविक त्याचे राजकीय परिणाम उमटणार होते. ते अण्णांच्या आंदोलनात दिसले, असं माझं वैयक्तिक मत :)

तंत्रज्ञानाच्या विकासासोबत माणसाच्या सामुहिक विकासाच्या संकल्पना बदलत जातात. संकुचित गोष्टींपासून सुटका होऊन माणूस व्यापक समाजहिताकडं पाहायला लागतो. किंबहुना पाहण्याचा आभास स्वतःभोवती निर्माण करतो. हा आभास निर्माण करणंही खूप महत्वाचं आहे. कारण, त्या आधीच्या काळात तो फक्त वैयक्तिक संकुचित विचार करत असतो. हा समाजहिताचा आभास निर्माण होणं आणि त्यातून प्रत्यक्ष कृतीकडं, ज्यातून सामाजिक हित आणि पर्यायानं वैयक्तिक विकास शक्य आहे, त्याकडं समाजातील प्रत्येक जण, इच्छा असो वा नसो, ढकलला जाणं, ही प्रक्रिया घडते. क्रांती म्हणजे हे असं काहीसं ढोबळ मानता येईल. तर, तंत्रज्ञानाच्या विकासासोबत हे घडायला लागतं. त्याचे परिणाम तत्काळ नाही; मात्र एक-दोन दशकांत दिसू लागतात.

भारतात हे अगदी असंच घडतंय असं वाटू लागलंय. ग्लोबलायझेशननंतर पहिल्यांदा काय झालं, तर सत्तेच्या एकेंद्रीकरणाला लोकशाही मार्गानं लोकांनी विरोध केला. आघाड्यांची सरकारं यायला लागली. ती स्थिर व्हायला लागली. कोणत्याही एका पक्षाच्या नादी लागायचं नाही, हे लोकांनी ठरवलं. त्यानंतरच्या काळात म्हणजे ग्लोबलायझेशनच्या दुसऱया दशकात एका पक्षाला बळ आणि बाकीच्यांना पुरेसा विरोध करण्याएवढी ताकद लोकांनी दिली.

निवडणूक मार्गानं बदल होत नाहीत, असं दिसलं, की आवश्यक ते बदल घडवून आणण्यासाठी संघटित आंदोलनाचे मार्ग वापरणं आणि त्यासाठी विकसित तंत्रज्ञान वापरणं हेही घडू लागतं.

अण्णांच्या आंदोलनात याचं दर्शन घडलं. ही काही परिपूर्ण क्रांती वगैरे नाही. तसंही कुठलीच क्रांती कधी परिपूर्ण नसते. क्रांती एखाद्या बदलाची सुरुवात करून देते. हा बदल होण्यास काही कालावधी लागतो आणि कधी कधी बदल होऊन नव्या जगाची व्यवस्था प्रस्थापित झालीय, हे समजण्यासही वेळ लागतो. हेच अण्णांनी घडवून आणलेल्या बदलांबाबत म्हणता येईल. आताच काहीबाही अर्थ-अन्वयार्थ लावून साऱया गोष्टी झिडकारणं तद्दन भंपकपणा ठरेल. जितकं महत्व आहे, तितकं ते समजून घेणं आणि त्यानुसार अर्थ लावणं इतकंच सध्यातरी केलं पाहिजे....