Wednesday, October 13, 2010

'दबंग'च्या खाणीतला 'मस्त मस्त' हिरा

काही गाणी मनात रुजतात. खोलवर. कुठंतरी आत भिडतात. त्यातले प्रत्येक शब्द, प्रत्येक आलाप प्रत्येकवेळी नवा अर्थ देऊन जातो. अत्यंत टिपिकल हिंदी चित्रपट 'दबंग'मध्ये असं गाणं मिळालं आणि जाम आनंदलो. अशी गाणी म्हणजे खूप देखण्या कविता असतात. कोरीव. त्यामुळंच कित्येकदा एेकल्या तरी पुनःपुन्हा एेकावाश्या वाटतातच...'दबंग'च्या कोळशाच्या खाणीतलं हे रत्न आहे, 'तेरे मस्त मस्त दो नैन'..

गीत लिहिलंय फैज अन्वर यांनी
संगीत आहे साजीद वाजीद यांचं
आणि गायक आहे राहत फतेह अली

ही देखणी कविता अख्खी लिहून काढावीशी वाटली !

ताकतें रहते तुझकों सांझ सबेरे
नैनो में हायें...
नैनो में...
हायें...
ताकतें रहते तुझकों सांझ सबेरे
नयनों में बसिया नैन ये तेरें
नयनोंमें बसिया नैन ये तेरें
तेरे मस्त मस्त दो नैन
मेरे दिलका ले गये चैन
मरे दिलका ले गये चैन
तेरे मस्त मस्त दो नैन

पहले पहल तुझें
देखा तो दिल मेरा
धडका हाये धडका
धडका हायें

पहले पहल तुझें
देखा तो दिल मेरा
धडका हाये धडका
धडका हायें
जलजल उठां हूँ मै
शोला जो प्यार का
भडका हायें भडका
भडका हायें
नींदोंमें घुल गये है
सपनें जो तेरे
बदले से लग रहे है
अंदाज मेरें
बदले से लग रहे है
अंदाज मेरें

तेरे मस्त मस्त दो नैन
मेरे दिलका ले गये चैन
मरे दिलका ले गये चैन
तेरे मस्त मस्त दो नैन

माहिं बेआबसा
दिल ये बेताबसा
तडपा जायें
तडपा जायें
नैनों की झिल में
उतरा ता युहीं दिल
डुबा जाये डुबा
डुबा जाये

होशों हवास अब तो
खोने लगे है
हम भी दिवाने तेरे
होने लगे है
हम भी दिवाने तेरे
होने लगे है
तेरे मस्त मस्त दो नैन
मेरे दिलका ले गये चैन
मरे दिलका ले गये चैन
तेरे मस्त मस्त दो नैन

ताकतें रहते तुझकों सांझ सबेरे
नयनों में बसिया नैन ये तेरें
नयनोंमें बसिया नैन ये तेरें
तेरे मस्त मस्त दो नैन
मेरे दिलका ले गये चैन
मरे दिलका ले गये चैन
तेरे मस्त मस्त दो नैन

Thursday, October 7, 2010

जिंदगी की किताब...

इक किताब होती जिंदगी...
हर इक पन्ना मै बंद कर देता
जब चाहूँ...
खोल देता वही पन्ना 
जिसें चाहूँ...

एहसास बन गया है अब
पन्नोंका...

जाना था जिनकों चलें गयें..
हाथ में थमाकर 
किताब जिंदगीकी की हम
ना खोल सकें ना बंद...

Wednesday, September 15, 2010

बाबा...

बाबा,

तुमच्याबद्दल लिहायचंय. तुमच्याबद्दल मला काय वाटतंय, हे सारं काही लिहायचंय. मोकळं व्हायचंय एकदा लिहून. खूप साचलंय सगळं. मनात रडायची सवय घातक. कधी जडलीय मला, तुम्हालाच माहिती. मोठ्यांदा रडायची सवय नाही आणि मनातल्या हुंदक्यांनी आत अंगभर कसर राहतेय. 

डोक्यात आठवणींचा कल्लोळ आहे. खूपशा. एकमेकांत गुंतत गेल्यात. काय लिहायचं, सुरूवात कशी करायची हेच सुचत नाहीय इतके दिवस. 

तुम्ही होता, तेव्हा कदाचित तुमचं अस्तित्व माझाच भाग होतं. ते लक्षातही नव्हतं आलं कधी...आता प्रत्येक दिवशी, जवळपास प्रत्येक क्षणी तुम्ही मला आठवताय. एक-दोन दिवस नाही, वर्षभर होतंय असं. आता जाणवतंय बाबा, तुम्ही माझ्यासाठी काय होतात...

खूप लहानपणी, म्हणजे माझ्या लहानपणी आपण दोघं मित्र होतो. शाळेतून यायच्या वेळी तुम्हीच तर घरी असायचात. भरवलेला प्रत्येक घास मला आत्ताच का रोज आठवतोय बाबा? तुमची नोकरी गेली होती आणि धंद्यात फसवणूक झाली होती, हे कधीच कसं तेव्हा लक्षात नव्हतं आलं? मी शाळेतून येताना दारात पायऱयांवर बसलेले तुम्ही दिसला नाहीत, तर होणारी चिडचीड लख्खं आठवतीय. आताही रोज घरी जाताना फ्लॅटचं दार उघडताना हीच चिडचीड होतेय बाबा...

खूप लिहायंचय बाबा. तुमच्याबरोबर जगलेला प्रत्येक क्षण लिहून काढायचाय. त्याशिवाय मोकळा होणार नाही बाबा मी...आणि कदाचित तुम्हीही...

Tuesday, August 3, 2010

महाबळेश्वरच्या पावसासारखं सुख नाही...!

  (फोटो काय आपला नाही. कुठून घेतला; आठवत नाही. ज्यानं काढला, त्याला सलाम...! आमच्या मनातलं त्यानं फोटोतनं दाखवलं म्हणून...)
पावसासारखं सुख नाही. धबाधबा कोसळणाऱया पावसात धुंद होऊन बाईक चालविण्यासारखं सुख खरंच नाही. अनुभवलं असेल, तर प्रश्नच नाही. नसेल कधी अनुभवलं, तर यंदाच्या पावसाळ्यात एकदा तरी अनुभवा. व्यक्तिशः मला हा प्रकार भयाण आवडतो. कधी एकदा पाऊस कोसळतो, असं होऊन जातं. मित्र बोंबलत असतात, की येड्या, पाऊस तेवढा नको रे आणि मी म्हणत असतो, अरे, येऊदे रे...येऊदे रे...

बाईक राईडसाठीचा पाऊस कसा झडझडून हवा. तासन् तास कोसळणारा. उगाच एखादी भुरटी सर सोडून जाणारा नव्हे. महाबळेश्वरसारखा किंवा कोयनेतल्या नवजासारखा. चिंब चिंब करणारा. नखशिखांत शिरशिरी आणणारा. महाबळेश्वरमध्ये एकदा अशा पावसात बाईक राईड केली होती. तिथंला पाऊस मुळातच अफाट. अंगावर येऊन येऊन धडका देणारा. तडातडा वाजणारा. एक एक थेंब गड्डी लसणाएवढा. पावसाचा स्वतःचा रौद्र नाद असतो, तो इथं अनुभवायला नक्की मिळतो.

महाबळेश्वरमध्ये अशा भर पावसात बाईक राईड करताना एकप्रकारची तंद्री लागते. आपोआप. आसपासचं काही भान राहात नाही. वीस-पंचवीस फुटी रस्ता. निर्मनुष्य. मागून गाडी नाही की पुढून नाही. सारं महाबळेश्वर गपगार झालेलं. फक्त एक बाईक. पावसात रस्ता कापत चाललेली. अशा पावसाशी मस्ती करायची नसते. दोस्ती करायची असते. म्हणजे, मस्तवालपणे बाईक मारायची नसते. पावसाला दाद देत, त्याच्याशी बोलत, त्याला मोठ्ठं मानून, मान देत हळू हळू चालायचं असतं. मस्तवालपणा केला, की कुठला तरी खड्डा तुमच्यासाठी आ वासून बसवतोच हा पाऊस...!

जुन्या महाबळेश्वरकडून येताना अशी झड लागली होती. दोन्ही बाजूंनी झाडी. ओलीचिंब. पानं पानं जणू पाझरायला लागलेली. पाण्याचे लोटच्या लोट रस्त्यातून वाहू लागलेले. वरून सर्र सर्र सपाटा सुरूच. रेनसूट नावाचा प्रकार अंगाला चिकटून बसलेला. वातावरणात फक्त पाऊस आणि पाऊस. सगळं जग नष्ट झालंय आणि सगळीकडं फक्त पाऊस उरलाय, असं फिल देणारा अॅम्बियन्स...पंधरा-वीस किलोमीटरच्या स्पीडनं अशी बाईक मारताना डोकंही आपोआप थंड होत गेलेलं. विलक्षण शांतता शरीरात भरू लागलेली. पावसाच्या प्रत्येक थेंबागणिक मेंदूतले विचार क्षीण होत गेलेले. समाधीबिमाधी वगैरे तत्सम प्रकारचा हा अनुभव...अचाट. अफाट. फक्त पाऊसच आणि तोही महाबळेश्वरसारखा पाऊसच देऊ शकेल असा अनुभव...

पुढचे दीड-दोन तास कसे गेले कळलं नाही. जसा वेगानं सुरू झाला, तसाच तो कोसळत राहिला...वाटेत थांबून थांबून ही ध्यानस्थ अवस्था अनुभवत राहिलो...दोनेक तासांनी जोर किंचितसा उतरल्यावर भान स्थिरस्थावर होऊ लागलं. स्वप्नामधून कुणीतरी अलगद उठवत असल्याची जाणिव होऊ लागली. महाबळेश्वरच्या मुख्य चौकापर्यंत आपण पोहोचलोय, हे कळण्याइतपत मेंदू जागा झाला...

Wednesday, July 21, 2010

चंद्राच्या जाळ्यात अडकला अशोकाचा मासा!

चंद्राबाबू नायडूंना जे करायचं होतं, ते त्यांनी केलं. पुरेपूर वसूल केलं. पडद्याआड गेलेल्या या 'सायबर लीडर'ला अख्ख्या नॅशनल मीडियानं डोक्यावर घेतलं. आंध्रातल्या नायडू समर्थकांनी आंदोलनं केली. चंद्राबाबूंना जे हवं ते सगळं सगळं मिळालं.

गमावलं ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी. अशोकरावांसोबत फिरणाऱया दीडशहाण्यांनी. चंद्राबाबूंना 'आत टाकण्याचा' विनोदी सल्ला देणाऱया प्रशासकीय चमच्यांनी.

समजा चंद्राबाबूंना नसतं 'आत टाकलं', तर काय घडलं असतं?

घडलं काहीच नसतं. ते आले असते आणि काहीच विरोध होत नाहीय, हे पाहून चडफडत गेले असते. नको तिथं 'अॅग्रेसिव्हनेस' दाखवण्याचा 'शहाणपणा' अशोकरावांना कधी नव्हे ते सुचला आणि अडचण पदरात पाडून घेतली. अशोकरावांवर वेळ इतकी वाईट आली, की चंद्राबाबूंसाठी खास विमाने मागवून त्यांना सोडायची पाळी आली. इतका राजकीय वेडगळपणा महाराष्ट्राच्या अख्ख्या इतिहासात कुठल्या राजकीय नेत्याने कधी केला नसेल.

मला एक भन्नाट कल्पना सुचली. चंद्राबाबूंना प्रसिद्धी मिळवायची होती नं? तीही मिळवून देता आली असती आणि महाराष्ट्राची इमेजही ठाकठीक राहिली असती. चंद्राबाबू 'आयटी सीएम'. महाराष्ट्र आज देशात आयटीमध्ये आघाडीवर जाण्याच्या (किमान) गोष्टी(तरी) करतो आहे. चंद्राबाबू आंदोलनासाठी येणार म्हटल्यावर महाराष्ट्रानं खरंतर या नेत्याचं तुफान स्वागत करायला हवं होतं. छान कमानी उभारून ठेवायला हव्या होत्या. त्यांनी महाराष्ट्रात पाऊल टाकताच, त्यांचं ओवाळून स्वागत करायला हवं होतं. जे काही दोन टीएमसीचं भुरटं धरण (खरंतर बंधारा) त्यांना पाहायचाय, तिथंच मंडप बांधून ठेवायला हवा होता. या मंडपात महाराष्ट्रातल्या टॉपच्या आयटी बॉसना आणि सेक्रेटरिएटमधल्या लोकांना तिथं बोलवायला हवं होतं. बंधाऱयाच्या बरोबरीनं 'इंडस्ट्रि'वरही चर्चा करूया, असं बाबूंना सुचवता आलं असतं.

बाबूंचा स्वभाव ज्यांना माहितीय, ते सांगू शकतील, की अशा चर्चेला बाबू रात्री झोपेतून उठवलं तरी तयार असतात. शेतकऱयांचा प्रश्न तर सोडवूच; शिवाय इंडस्ट्रीच्या वाढीसाठीही काही करूया, असं आवाहन बाबूंना केलं असतं, तर चंद्राबाबू हिरो बनू शकले नसते.

महाराष्ट्राची सध्याची प्रशासकीय यंत्रणा म्हणजे बाजारगप्पावीर आहेत. धोरण, मुत्सद्दीपणा या गोष्टी त्यांच्या अंगाला हजार योजने दुरूनही स्पर्शून गेल्या असतील, असं मानण्याची संधी अगदी क्वचित मिळते. कुठलाही प्रश्न येवो, अत्यंत घाईने, मुर्खपणाने आणि बालिशपणाने मुद्दा हाताळणे, ही त्यांची खासियत बनली आहे. अख्खं जग प्रत्येक प्रश्नाचा 'जरा हटके' विचार करून पाहते, वेगळ्या पद्धतीनं उत्तर मिळविण्याचा प्रयत्न करते आणि महाराष्ट्र मात्र 'हटके' विचारांपासून फटकून वागतो आहे. चंद्राबाबू उद्या आंध्रच्या आणि नंतर देशाच्या राजकारणात पुन्हा झळकू लागले, तर त्याचं 'श्रेय' सर्वश्री अशोकराव आणि त्यांच्या सल्लागारांच्या वेडेपणाला असणार आहे !!!

Thursday, July 15, 2010

लख्ख हसा आणि 'वीकली रोड शो' टाळा !

हसण्यात गंमत आहे. हसवण्यात गंमत आहे. कुणाच्याही चेहऱयावरचं हसू पाहण्यातही गंमत आहे. हसण्यानं नाती जुळतात. हसण्यातून नाती वाढतात. आज सकाळची गंमत. एरव्ही हाणामारीचा प्रसंग. तू-तू, मी-मी होणारच होतं. शिव्यांची लाखोली उगवणार होती. सकाळ-सकाळी नसता ताप डोक्यात घुसणार होता. सारं टळलं. सारं सारं. एका हसण्यानं. आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलं. म्हणून अप्रूप...

प्रसंग असा होता:
बाईकवरून तंद्रीत निघालो होतो. ऑफिसची वेळ गाठायची होती. नेहमीप्रमाणं ट्रॅफिक तुंबलं होतं. जिथंतिथं तुंबलेल्या ट्रॅफिकच्या धुराचा वास कोंडलेला. डोक्यावर उन्हं. एेन जुलैच्या मध्यावर सकाळी दहाच्या वेळेसच रणरणतं उन्हं. अधून-मधून विनाकारण वाजणारे कर्कश्श हॉर्न. माणसांच्या मानसिकतेचं प्रतिबिंब त्या हॉर्नच्या आवाजातून डोकावणारं !

सिग्नल सुटला. गाड्या तिरासारख्या पुढं धावल्या. पुढच्या चौकाचा सिग्नल रेड व्हायच्या आत ओलांडायची घाई साऱयांना लागलेली. मीही त्यातलाच. सुस्साट सुटलेली बाईक कच्चकन ब्रेक लावून थांबवली ती पुढचा सिग्नल रेड लागला म्हणून. मी अचानक थांबलो, तसेच पॅरलल गाड्याही थांबल्या. सगळे माझेच भाऊबंद. थांबल्याच्या क्षणानंतर दोन सेकंदात मागून धाड्कन धडक बसली आणि मी जवळपास पुढे उडालोच. कोसळलो नाही इतकंच. बाकी सगळं झालं. धडपडलो. आणि सगळा राग त्या क्षणी डोक्यात साठून आला. इतकी तिडिक की मी मागंही नं पाहता बाईक भर सिग्नलला स्टॅंडवर लावली आणि उतरलो. मागं पाहिलं; तर साधारण माझ्याच वयाचा, माझ्याच सारखा खांद्याला लॅपटॉप अडकवून चाललेला आणखी एक 'नोकरधारी' !

आता याला सोडायचं नाही, या विचारात गाडीची काही मोडतोड झालीय का पाहात त्याच्याकडं वळलो.

त्यानंही गाडी लावली. मी किंचितही न दुखावलेले इंडिकेटर चेक करत असताना 'नोकरधारी'नंही गाडी तश्शीच लावली आणि माझ्याकडं येताना दिसला. मी वाकून जणू राग वाढवत गाडी चेक करत असताना खांद्यावर अलगद हात ठेवला गेला. 'आय एम सॉरी...', 'नोकरधारी' लख्ख आवाजात म्हणाला.

मी मागं पहिल्यांदा सिग्नलकडं पाहिलं. अजून ४० सेकंद बाकी होते. मग सरळ उभा राहून 'नोकरधारी'ला नजर भिडवली.

चेहराभर पसरलेलं हसू, हसरे डोळे.

थक्कच झालो. भर सिग्नलला, दगदगीच्या शहरात, एक अपघात घडवूनही त्याचा चेहरा मस्त छान हसरा.

मी क्षणभर सुन्न. 'आय एम सॉरी. मला खरंच माफ करा. मला आवरली नाही बाईक. नवीन आहे नं...', 'नोकरधारी' जणू वर्षानूवर्षीचा मित्र बोलावा तसा अगदी हसऱया चेहऱयानं बोलत राहिला.

काहीच न सूचून मी गाडीवर बसलो. सिग्नल सुटला. पुढं आलो. आणि बाईक पुन्हा बाजुला घेतली. एरव्ही या अशा धडकांचे रिझल्ट ठरलेले. दोघांनीही वाद घालायचे. भरपूर. कुठले तरी राग इथं काढायचे आणि मग मार्गस्थ व्हायचे. आज काहीतरी वेगळं जाणवलं होतं.

'नोकरधारी'ही पाठोपाठ आला. माझ्या मागं थांबला. बाईकवरून उतरला. जवळ आला आणि पुन्हा लख्ख आवाजात हसत म्हणाला, 'आय एम सॉरी...'.

ना राग ना चीडचीड. चेहराभर फक्त हसू.

मलाही राहावेना. मीही हसलो. 'इट्स ओके buddy!...'

'Sure. पुन्हा पण, असं नको...!'...'नोकरधारी'चं लख्ख हसू.

बाईकवर बसून तो भुर्रकन निघून गेला.

मीही निघालो. विचारात ऑफिसही गाठलं. सगळं वेळेवर जमलं. मग जाणवू लागलं, अरे, हा नसता हसला तर? काय घडलं असतं? वीकली रोड शोच नं? याच्या एका हसऱया स्वभावानं कसला भारी बदल घडला...राग पाहता पाहता पळून गेला. एक स्वच्छ हसू आणि 'आय एम सॉरी'नं रोड शोला किती छान बदलून टाकलं. आणि आपण इतके भंपक की त्याचं नावही नाही विचारलं...

Wednesday, July 14, 2010

जन्मोजन्मीचे देणे...

सांजवेळ ढळताना
रात सारी कलताना
सय आठवांची उरी

ओले मोती होते साथी
सारे तुझेच सांगाती
आसवांची दाटी आता
उरे माझ्या गं सोबती

प्रकाशाची रेघ भाळी
किरणांची गं तू नव्हाळी
पाणावल्या डोळ्यांत आता
अंधाराची नक्षी सारी

चालताना आभाळात
हात होता तुझा हातात
झाला चांद पोरका आता
वनवास चांदण्यांत

तुझा भास खुणावे
आण तुझी सतावे
जन्मोजन्मीचे देणे आता
कोण्या जन्मी फिटावे?