Wednesday, July 21, 2010

चंद्राच्या जाळ्यात अडकला अशोकाचा मासा!

चंद्राबाबू नायडूंना जे करायचं होतं, ते त्यांनी केलं. पुरेपूर वसूल केलं. पडद्याआड गेलेल्या या 'सायबर लीडर'ला अख्ख्या नॅशनल मीडियानं डोक्यावर घेतलं. आंध्रातल्या नायडू समर्थकांनी आंदोलनं केली. चंद्राबाबूंना जे हवं ते सगळं सगळं मिळालं.

गमावलं ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी. अशोकरावांसोबत फिरणाऱया दीडशहाण्यांनी. चंद्राबाबूंना 'आत टाकण्याचा' विनोदी सल्ला देणाऱया प्रशासकीय चमच्यांनी.

समजा चंद्राबाबूंना नसतं 'आत टाकलं', तर काय घडलं असतं?

घडलं काहीच नसतं. ते आले असते आणि काहीच विरोध होत नाहीय, हे पाहून चडफडत गेले असते. नको तिथं 'अॅग्रेसिव्हनेस' दाखवण्याचा 'शहाणपणा' अशोकरावांना कधी नव्हे ते सुचला आणि अडचण पदरात पाडून घेतली. अशोकरावांवर वेळ इतकी वाईट आली, की चंद्राबाबूंसाठी खास विमाने मागवून त्यांना सोडायची पाळी आली. इतका राजकीय वेडगळपणा महाराष्ट्राच्या अख्ख्या इतिहासात कुठल्या राजकीय नेत्याने कधी केला नसेल.

मला एक भन्नाट कल्पना सुचली. चंद्राबाबूंना प्रसिद्धी मिळवायची होती नं? तीही मिळवून देता आली असती आणि महाराष्ट्राची इमेजही ठाकठीक राहिली असती. चंद्राबाबू 'आयटी सीएम'. महाराष्ट्र आज देशात आयटीमध्ये आघाडीवर जाण्याच्या (किमान) गोष्टी(तरी) करतो आहे. चंद्राबाबू आंदोलनासाठी येणार म्हटल्यावर महाराष्ट्रानं खरंतर या नेत्याचं तुफान स्वागत करायला हवं होतं. छान कमानी उभारून ठेवायला हव्या होत्या. त्यांनी महाराष्ट्रात पाऊल टाकताच, त्यांचं ओवाळून स्वागत करायला हवं होतं. जे काही दोन टीएमसीचं भुरटं धरण (खरंतर बंधारा) त्यांना पाहायचाय, तिथंच मंडप बांधून ठेवायला हवा होता. या मंडपात महाराष्ट्रातल्या टॉपच्या आयटी बॉसना आणि सेक्रेटरिएटमधल्या लोकांना तिथं बोलवायला हवं होतं. बंधाऱयाच्या बरोबरीनं 'इंडस्ट्रि'वरही चर्चा करूया, असं बाबूंना सुचवता आलं असतं.

बाबूंचा स्वभाव ज्यांना माहितीय, ते सांगू शकतील, की अशा चर्चेला बाबू रात्री झोपेतून उठवलं तरी तयार असतात. शेतकऱयांचा प्रश्न तर सोडवूच; शिवाय इंडस्ट्रीच्या वाढीसाठीही काही करूया, असं आवाहन बाबूंना केलं असतं, तर चंद्राबाबू हिरो बनू शकले नसते.

महाराष्ट्राची सध्याची प्रशासकीय यंत्रणा म्हणजे बाजारगप्पावीर आहेत. धोरण, मुत्सद्दीपणा या गोष्टी त्यांच्या अंगाला हजार योजने दुरूनही स्पर्शून गेल्या असतील, असं मानण्याची संधी अगदी क्वचित मिळते. कुठलाही प्रश्न येवो, अत्यंत घाईने, मुर्खपणाने आणि बालिशपणाने मुद्दा हाताळणे, ही त्यांची खासियत बनली आहे. अख्खं जग प्रत्येक प्रश्नाचा 'जरा हटके' विचार करून पाहते, वेगळ्या पद्धतीनं उत्तर मिळविण्याचा प्रयत्न करते आणि महाराष्ट्र मात्र 'हटके' विचारांपासून फटकून वागतो आहे. चंद्राबाबू उद्या आंध्रच्या आणि नंतर देशाच्या राजकारणात पुन्हा झळकू लागले, तर त्याचं 'श्रेय' सर्वश्री अशोकराव आणि त्यांच्या सल्लागारांच्या वेडेपणाला असणार आहे !!!

1 comment: