Saturday, March 6, 2010

निखळ आनंददायी...बुक थेरपी

खूप छान कविता वाचली, की मन प्रसन्न होतं.
ग्रेसच्या एखाद्या ओळीचा नव्यानं अर्थ उलगडला की छान वाटू लागतं.
नेमाडे, गौरी देशपांडे यांच्यासारखं कोणी हाताला लागलं, तर पुस्तक पूर्ण संपवूनच उठावसं वाटतं.
आठ-पंधरा दिवस काहीच नवं वाचलं नाही, तर अस्वस्थ होऊ लागतं.
एखादी गोष्ट मनात इतकी साठून राहते, की लिहून काढल्यावरच चैन पडतं...

हे काय आहे? असं का होतं...?

परवा सर्फिंग करताना मिळाली या प्रश्नांची उत्तरं. मी काटेकोर डॉक्टर टाळणारा. शक्यतो डॉक्टरची पायरी नकोच, या मताचा. तरीही अॅलोपथीपासून म्युझिक थेरपीपर्यंत काही ना काही गोष्टींची किमान माहिती आहे. सामान्य ज्ञान म्हणा हवं तर.

पण, नव्हती ती 'बुक थेरपी'ची माहिती.

अशी थेरपी खरेच आहे. बुक थेरपी. विशेषतः मानसोपचारातील ही महत्वाची पद्धती आहे. गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना मार्गावर आणण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. अर्थातच, मला मिळालेल्या लिंकवर आणि त्यानंतर केलेल्या सर्चमध्ये बुक थेरपी अधिकाधिकरित्या शालेय विद्यार्थ्यांसाठी वापरण्याबद्दल मार्गदर्शन होतं. तरीही, ही थेरपी आपणही अधून मधून स्वतःच्या नकळत वापरत आहोतच, हेही हळू हळू लक्षात येत होतं.

कंटाळलेल्या, मरगळलेल्या मनाला उभारी आणण्याचं काम प्रेरणादायी पुस्तकं करू शकतात. निराश झालेल्या मनांमध्ये आशेची ज्योत पुस्तकं करू शकतात. अडचणींवर मात करण्याचं कसब पुस्तकांतून मिळविता येतं. आव्हानांना सामोरं जाण्याचं धैर्य पुस्तकातून हाती येतं. दुखावलेल्या मनावर फुंकर पुस्तकं घालू शकतात. डोक्यात घट्ट घुसून घर केलेल्या ताणाला झटक्यात पळवून लावण्याचं कामही पुस्तकंच करू शकतात...

बुक थेरपीचे असे अनेक फायदे.
साईड इफेक्टस् शून्य.

मग जाणवलं, 'रामायण', 'महाभारत', 'ज्ञानेश्वरी', 'तुकाराम गाथा' ही या बुक थेरपीचीच पुरातन रुपं. या महाकाव्यांनी कित्येक पिढ्यांना प्रेरणा दिली. उभारी दिली. शांती दिली. हसवलं. विचारांना चालना दिली आणि रस्ताही दाखवला...

आजही काय वेगळे आहे? आवडलेल्या पुस्तकात आपण रमून जातो, म्हणजे होतं तरी काय? ध्यानच लागतं नं आपलं? सारं काही विसरून एखाद्या पुस्तकात असं रमून जाणं हे आपल्या मनावर होत असणारे उपचार तर असतात. मनाला पुन्हा ताजंतवानं करणारे...

बुक थेरपी ही अशी पुनःपुन्हा वापरून पाहावी अशी असते...

2 comments:

  1. मित्रा, अगदी योग्य शब्दात तू मांडणी केली आहेस. सध्या मी पण ह्या phase मधून जातोय .मिलिंद बोकील यांचे "शाळा" वाच मस्त आहे

    ReplyDelete