Thursday, February 11, 2010

गती मंदत्व आणि चार प्रश्न

महाराष्ट्रात आज-काल जे चाललंय, ते शुद्ध गती मंदत्व आहे.
गती मंदत्व म्हणजे वेडेपणा नव्हे.
गती मंदत्व म्हणजे सारासार विवेकाने कृतीची शक्यता गमावणे. तर्कशुद्धतेचा अभाव.
'सर्वन्यायी' सेना आणि जोडेवाहू सत्ताधारी यांच्यात आलेले गती मंदत्व महाराष्ट्राची धार बोथट करतेय.
कुणी कुठे खेळावे, कुणासोबत खेळावे, कोणत्या मुव्हीमध्ये काय करावे, काय बोलावे यापेक्षा काही महत्वाचे उरलेच नाहीय का?
पेपर उघडला की तेच. पेपर मिटून टीव्ही लावला की तेच. हापिसात जाऊन इंटरनेट उघडले की तेच. काय धंदा आहे हा?

१. रस्त्यावरून जाताना मला रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. हापिसात पोहोचलो की हुश्श वाटतं.
दिवसभर (बॉस असतानाही...!) कसं सेफ वाटतं.
संध्याकाळी जणू मृत्यूच्या वाहत्या गर्दीत गाडी चालवावीशी वाटतच नाही. धाडसही होत नाही. त्यामुळं हापिसात गप्पगार पडून राहतो.
गर्दीचा पूर ओसरू लागला, की हळूच पळतो. सकाळच्यापेक्षा थोडंफार तरी सेफ वाटतं.
गाडी निट, सुरक्षितपणे चालविण्याचा आत्मविश्वास मी गमावलाय, हा प्रश्न या 'गती मंदत्व आलेल्यांनी' उभ्या केलेल्या प्रश्नापेक्षा अधिक महत्वाचा नाहीय का?

२. घरचा गॅस अचानक संपला, की पोटात गुडगुड वाजतं. हातपाय गळतात अक्षरशः. आता कसं जगायचं, गॅस कुठून मिळवायचा हा प्रश्न पडतो.
कुणा-कुणाच्या हाता-पाया पडून गॅस जोडला, की त्या लबाडालाही मी त्या क्षणाचा देव मानतो.
लबाडांना देव बनविण्यानं आलेला हताशपणा कसा घालवू, हा प्रश्न या 'गती मंदत्व आलेल्यांनी' उभ्या केलेल्या प्रश्नापेक्षा अधिक महत्वाचा नाहीय का?

३. कुणाला पटो वा न पटो. महिन्याचं बजेट खरंच कोसळतंय. चेहऱयावरचा ताण वाढतोय. भाजीचे दर वयस्कर चेहऱयावरच्या सुरकुत्यांप्रमाणे वाढताहेत.
प्रवास करताना मला रानंच्या रानं शेतीनं लगडलेली दिसतात. तरीही साखर महागतेय, भाजी परवडत नाहीय, दुध कडू झालंय.
शेतीचं हे अर्थकारण असं कसं कसंही चालतं? हा प्रश्न मला पडणारा प्रश्न या 'गती मंदत्व आलेल्यांनी' उभ्या केलेल्या प्रश्नापेक्षा अधिक महत्वाचा नाहीय का?

४. मुलाच्या शाळेत पालकसभेला जातो मी. मुलाला कसं वाढवायचं, ही चिंता तिथं प्रत्येकाच्याच मनात दडलीय. कुणी उघड मांडतंय. माझ्यासारखं कुणी त्यांच्या मांडण्यावरून ठोकताळे बांधतंय.
आत्महत्येच्या बातम्या वाचून जीव गलबलतोय. तरीही मंत्री-संत्री बिनबोभाट फिरताना दिसतात. निबर कातडीने. जडावू शरीरानं.
मुलांच्या भविष्याचं काय? हा प्रश्न या 'गती मंदत्व आलेल्यांनी' उभ्या केलेल्या प्रश्नापेक्षा अधिक महत्वाचा नाहीय का?

हे चार प्रश्न म्हणजे मध्यमवर्गीयांचं जगणं नव्हे. हे अगदी मान्य.
पण, जे प्रश्न म्हणून मध्यमवर्गीयांसमोर उभं केलं जातं आहे, ते आमचे प्रश्नच नव्हेत, हे तरी मान्य आहे नं?

No comments:

Post a Comment