Friday, February 19, 2010

सगळीकडं फक्त माणसं...

अखेर मिळाला.
सापडत नव्हता. हे ट्राय केलं. ते केलं. सगळं केलं.
डोकं भंजाळलं.
तरीही सापडत नव्हता. सगळीकडं शोधलं.
मग मिळाला.
म्हणजे तसा तो मिळालाच नाही.
बदलला.
ब्लॉगचा पासवर्ड.
ई मेलसुद्धा आठवत नव्हता. आणि पोस्टची हुक्की आली होती.
अलिकडं असं सतत होतं. विस्मरण. माणसं समोर आली की लक्षात येतात. नाव अजिबात आठवत नाही. चेहरा ओळखीचा वाटतो. माणसं खूप झालीत, त्यामुळं असं होतंय का?
काहीच लक्षात येत नाही. रस्त्यावर माणसं. गर्दी. सिग्नलला खेचाखेची. ऑफिसमध्ये माणसं. मुव्हीला गदारोळ. शांत म्हणून बाहेर जावं, तर गाड्यांची ही गर्दी. सगळीकडं फक्त माणसंच माणसं. मान्य आहे हे जग माणसांचंच आहे. पण, म्हणून काय सगळीकडं अशी खच्चून भरलेली असावीत? इतकी माणसं झाली, की कदाचित त्यांची किमत कमी होते का? मलातरी तसंच वाटतंय. हे अर्थशास्त्राप्रमाणेच. पुरवठा वाढला, की किमत घसरते. माणसांचीही घसरलीय. त्यामुळं अपघातांच्या बातम्यांवर फक्त नजर फिरते. बॉम्बस्फोट झाला का, अरे रे वाईट झालं, यापलिकडं भावना सरकत नाहीत. एकप्रकारचं साचलेपण हे माणसांच्या गर्दीमुळं निबर झालेल्या मानसिकतेचंच प्रतिक आहे.
म्हणजे असं मला वाटतंय. तुम्हाला वाटायलाच पाहिजे, असं काही नाही...!

No comments:

Post a Comment